भाऊसाहेब, रावसाहेब त्या वेळी कुठे असता हो!

भाऊसाहेब, रावसाहेब त्या वेळी कुठे असता हो!

कोल्हापूर - खरेदी-विक्री व्यवहाराचा दस्त नोंदणीसाठी एखादा सामान्य नागरिक गेला, तर त्याच्यासमोर शंभर नियमांची जंत्री समोर ठेवणार. अमुक एक कागद आहे का, तमुक एक पुरावा आहे का? मात्र एकच प्लॉट तिघांना विकला तरी मुद्रांक व नोंदणी विभाग अशा दस्ताची नोंद कशी करून घेतो, असा प्रश्‍न उपस्थित होतो. भाऊसाहेब, राबसाहेब या वेळी नेमके कुठे जातात, असाही प्रश्‍न आहे. 

राजेंद्रनगर येथे काल (ता. १२) एकच प्लॉट तिघांना विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बनावट आधार कार्ड आणि तोतया व्यक्ती उभी करून हा दस्त नोंदला गेला आहे. हा व्यवहार उघडकीस आला म्हणून ठीक... असे आणखी किती व्यवहार असतील जे बनावट आहे, असा प्रश्‍न आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार करायचा म्हटले तरी त्यास तीन महिन्यांच्या आतील सात-बारा आणि मिळकतपत्रिका, ऑनलाइन सात-बारा, साक्षीदार त्यांचे पुरावे, मान्यता, शेवटी ज्याला हिस्सा खरेदी द्यायचा आहे त्याला तुम्हाला हा व्यवहार मान्य आहे का, अशी विचारणा दुय्यम निबंधकांकडून केली जाते. सगळे व्यवहार कायद्याच्या चौकटीत असल्याचे दाखवले जाते. मात्र, ज्या जागांना सोन्याचा भाव आहे, विशेषतः महामार्गालगतच्या जागांबाबत बनावट दस्तांची नोंदणी संख्या सध्या वाढली आहे. चांगला भाव येतो म्हणून विकणारा विकतो आणि खरेदीदाराला हाच व्यवहार अन्य इतरांशी झाला आहे हे ध्यानात येते. त्यावेळी त्याचे डोळे पांढरे होतात. एकतरी पै पै साठवून लोक प्लॉट अथवा फ्लॅट घेतात. त्यातही अशी फसवणूक होते.

एखाद्या मिळकतीचा ‘सर्च रिपोर्ट’ हा त्या मिळकतीची कुंडली सांगून जातो. मात्र, हा रिपोर्टच बनावट देऊन व्यवहार करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. दुय्यम निबंघकांकडे रिपोर्टची मागणी केली की ते देतात. मात्र, खरेदीदार संबंधित मिळकतीचा शेवटचा मालक कोण याची खातरजमा न करता एखाद्यावर विश्‍वास टाकतो आणि येथेच घोळ होतो. बॅंकेची कर्जासाठी फसवणूक करण्यासाठी असा दस्तांचा आधार घेतला जातो. 

अडचणीतील जागा सोडविणे. खरेदी करणे, दस्त करणे यांसाठी साखळी कार्यरत आहेत. एखादा अधिकारी बदलून आला, की त्याच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून अन्य सुविधा देण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. साखळीचा दस्त नोंदणीसाठी आला, की त्यात ‘क्‍युरी’काढली जात नाही. अर्थात त्यामागे नेमके काय कारण आहे हे सर्वज्ञात आहेत. लिपिकापासून ते रावसाहेब, भाऊसाहेब हे साखळीच्या परिचयाचे आहेत. ओळखीमुळेच बनावट दस्त नोंदले जात आहेत. संबंधित मिळकतीचा सर्च रिपोर्ट न पाहता दस्त नोंदले जातात. नंतर सात-बारा अथवा मिळकत पत्रिकेला नाव लावायला गेलात तर पूर्वीच्या मालकाच्या नावाभोवती गोल झालेला नसतो. किंबहुना मागील नोंदीही कायम असल्याचे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com