जामखेड : आगामी काळात विषमुक्त शेती, शिक्षण, आरोग्य विषयावर मोहीम हाती घ्यायची आहे. हे सर्व सामाजिक विकासाचे कार्यक्रम राजकीय बॅनरखाली होणार नाहीत. ते सर्वसमावेशक असतील, त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे. यापुढे महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा असेल, असे प्रतिपादन बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.
सोमवारी (ता. 25) आमदार रोहित पवार, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, पंचायत समिती कर्जत-जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने "चला समृद्ध गाव घडवूया अभियान' अंतर्गत जामखेड येथे सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होत्या.
या वेळी आदर्श सरपंच चंदू पाटील, जलतज्ज्ञ मिलिंद बागल, तहसीलदार विशाल नाईकवाडी, गटविकास अधिकारी कोकणे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाल्या, ""गावचे सरपंच हेच कॅप्टन आहेत, तर ग्रामस्थ हे त्या क्रिकेट टीमचे खेळाडू आहेत. गाव घडवताना त्यांनी एकत्र आले पाहिजे. लिंबू या फळाचे लवकरच सुधारित वाण आणू.''
तालुका कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, ""गटशेती व फळशेती यावर भर दिला पाहिजे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे तांत्रिक साह्य मिळायला हवे.''
सरपंच पाटील म्हणाले, ""राजकारण सोडून आपल्या गावात काय चाललंय हे बघणे महत्त्वाचे आहे. निवडणूक आल्यानंतर आमदार पवार यांनी महिन्यातच कार्यशाळा घेतली. ही विकासाची सुरवात आहे.
जलतज्ज्ञ मिलिंद बागल यांनी पाणी, शेती, कर्जत-जामखेडची परिस्थिती, त्यात येणारी पिके याबद्दल मार्गदर्शन केले. जलयुक्त शिवार अभियान हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यात आणले, याबद्दल त्यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.