निपाणी - दहावी-बारावीच्या परीक्षा उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत. शैक्षणिक वर्षातील परीक्षांचे दिवस महत्त्वाचे असल्याने त्यांच्यासह पालकांमध्ये धास्ती वाढली आहे. परंतु मुलांना नुसते अभ्यासात गुंतवून न ठेवता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, असा सल्ला समुपदेशकांसह तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा तीव्र झाल्याने प्रत्येक जण धावपळीचे जीवन जगत आहे. परिणामी त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. आई-वडील दोघेही नोकरीला जात असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वास्तविक प्रत्येक पालकांनी मुलांच्या दैनंदिन वर्तनासह खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परीक्षाकाळात चॉकलेट, पिझ्झासारख्या जंक फुडपासून दूर ठेवण्याची गरज आहे.
दैनंदिन आहारात भाजीपाला, राजगिऱ्याचे लाडू, मोड आलेल्या धान्याची उसळ, गुळाची चिक्की आरोग्यास पोषक आहे. सकाळी अभ्यासाच्या तणावामुळे अनेक विद्यार्थी उपाशीपोटी शाळेला जातात. त्यांच्यावर गुणांच्या अपेक्षांचे ओझे काही पालक लादत असल्याने आरोग्य बिघडते. त्याकडे पालकांनी दडपणापासून मुलांना दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.
पहिल्या टप्प्यापासून अभ्यास चांगला केल्यास पाया मजबूत होतो. वाढत्या वयानुसार त्यांच्या बौद्धिक विकासासाठी पोषक आहाराची गरज आहे. दररोजच्या आहारातून प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन मिळेल, या पद्धतीने वेळापत्रक केल्यास विद्यार्थी निरोगी वातावरणात परीक्षा देऊ शकतील.
- जेतिबा पाटील,
शिक्षक, पार्श्वमती कन्या विद्यालय, अक्कोळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.