लग्न झाले.. मुलीसह नातेवाईक पळून गेले...

लग्न झाले.. मुलीसह नातेवाईक पळून गेले...

कोल्हापूर -  शेतकरी कुटुंबातील मुलग्यासाठी एका एजंटने मुलगी सुचवली. विवाह ठरवण्यासाठी ६० हजार रुपये मुलीच्या कुटुंबीयांना आणि २० हजार रुपये एजंटला असे ठरले. समाजात हवी तशी मुलगीच मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या नातेवाइकांनी होकार दिला. पुढे मुलीसह बारा-तेरा नातेवाईक घरी आले. यादी पे शादी झाली आणि सगळेच मिळून दागिन्यांसह पळून गेले. आजही तो शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि त्याचे नातेवाईक आश्‍चर्य करत आहेत; मात्र अब्रू जाईल म्हणून याची नोंद केलेली नाही.

हकीकत अशी, की गावातील एका मुलग्याने ४० हजार रुपये मुलीच्या कुटुंबीयांना दिले आणि विवाह केला. यासाठी एक एजंटच पुढे होता. राधानगरी तालुक्‍यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलग्यालासुद्धा लातूरमधील एक ‘स्थळ’ आले. यासाठीही लातूर परिसरातील एजंटचा पुढाकार होता. मुलगी देखणी असल्याचे एजंटने सांगितले. याच वेळी मुलगीच्या कुटुंबीयांना ६० हजार रुपये द्यायचे आणि एजंटला २० हजार रुपये द्यायचे ठरले. मुलगी देखणी होती. विवाह जमला. मुलगीसह १२-१३ जण थेट गावात येणार होते. तेथे मुलगीला त्यांचे नातेवाईक तीन तोळे सोने घालणार आणि मुलग्याने मुलगीला चार तोळ्यांचे दागिने घालण्याचे ठरले. मुलग्याने आईचे काही दागिने मोडून मुलगीला चार तोळ्यांचे दागिने केले. सर्वजण गावात आले. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर तातडीने यादी पे शादी झाली. दोन दिवसांत पूजाही झाली. दरम्यान सर्व नातेवाईक त्यांच्याच घरी थांबले. यानंतर नातेवाईकांना बस स्टॅण्डवर घालवण्यासाठी मुलगी आणि मुलग्याचा एक नातेवाईक गेला; मात्र थोड्याच वेळात तेथून मुलगीसह सर्वजण गायब झाले. 

मुलग्याच्या नातेवाईकाला याचा पत्ताही लागला नाही. साधारण तासाभरानंतर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध सुरू झाली; मात्र मोबाइल बंद लागले. 

सावधान, माहिती घ्या...
विवाह जुळवण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी फसवणूक होत आहे. पालकांसह मुलगा-मुलगीने नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती घेतल्याशिवाय विवाहास तयार झाल्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. विशेष करून ग्रामीण भागात ही फसवणूक होत आहे. विवाह इच्छुकांनी आणि नातेवाईकांनीही फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

‘लेक वाचवा’ अधोरेखित
मुलींची संख्या कमी झाल्यामुळेही मुलांना योग्य मुलगी मिळत नसल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळेच मुलीच्या नातेवाईकांना पैसे देऊन लग्नासाठी मुलगी आणण्याची नवीन पद्धत रुढ होत आहे. ‘लेक वाचवा’ या अभियानाचे महत्त्व आजही असल्याचे अधोरेखित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com