मोदींमुळे साखर उद्योगाला ‘अच्‍छे दिन’- मुख्यमंत्री फडणवीस

मोदींमुळे साखर उद्योगाला ‘अच्‍छे दिन’- मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज कागल येथील कारखाना कार्यालय परिसरात एका शानदार कार्यक्रमात झाले. त्यानंतर जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या मैदानावर आयोजित विराट शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की ज्यावेळी मोदींचे सरकार सत्तेत आले, त्यावेळी विरोधकांनी साखर उद्योगावरून खिल्ली उडवली. यांना उसातील आणि साखरेतील काय कळते, असे विरोधक म्हणायचे. यांच्या काळात साखर कारखानदारीचे काय होणार आहे, असेही ते म्हणत होते. यांनी साखर कारखाना पाहिलेला नाही, काढलेला नाही अशी टीकाही विरोधकांनी केली. पण, आज एक गोष्ट अभिमानाने सांगतो, ऊस आणि साखर कारखाना याबाबतीत गेल्या पाच वर्षांत जे निर्णय घेण्यात आले ते यापूर्वी कधीही झालेले नाहीत. त्यामुळे अडचणीत असलेली साखर कारखानदारी पुन्हा उभी राहिली.  साखरेचा हमीभाव निश्‍चित केल्याने साखरेचे भाव स्थिर झाले. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी म्हणून जे निर्णय घ्यावे लागतील, ते आम्ही घेतले आणि यापुढेही घेऊ. त्यातून कारखानदार आणि शेतकरी उभे राहतील.

ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आमचे सरकार आहे. गेल्या वर्षी ९९.९५ टक्के, तर यावर्षी ९६ टक्के ‘एफआरपी’ दिली आहे. उरलेली रक्कमही देणार आहोत. त्यासाठी साखरेला हमीभाव निश्‍चित करण्याचा उद्योगाच्या इतिहासातील पहिला व ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्याचा कायदा जुनाच होता, पण त्याचा अंमल आम्ही केला. त्यामुळे एफआरपी देण्याचा प्रश्‍न निकालात निघाला आहे.

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष घोरपडे यांनी आभार मानले. 

यापुढे साखरचं ‘बायप्रोडक्‍ट’
जगाच्या बाजारात साखरेची मागणी फार नाही. उत्पादन व मागणीत तफावत आहे. म्हणून उपपदार्थावर जोर द्यायचा, त्यासाठी विविध पॅकेज आणि योजना आणायच्या हे काम सुरू आहे. यासाठी इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतला. ‘बी हेवी’ मोलॅसिसपासूनही इथेनॉल तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे भविष्यात कारखान्यात साखर ही बायप्रोडक्‍ट होईल आणि उपपदार्थांच्या उत्पादनावर कारखानदारी चालेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

समरजितसिंह यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
पुतळा अनावरण व त्यानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यक्रमाला तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. अतिशय नेटक्‍या नियोजनात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच प्रचंड पाऊस झाला. पण, मुख्यमंत्री जिल्ह्यात पाऊस घेऊन आले, अशा शब्दांत श्री. घाटगे यांनी आनंद व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com