सांगली - सांगलीत महापुराने थैमान घातले असताना महापालिकेचे नगरसचिव बाळासाहेब मल्लेवाडे या आपत्तीच्या काळात चक्क गैरहजर राहिले. हे उघडकीस आल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज त्यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले.
महापुराच्या काळात महापालिकेची यंत्रणा गाफील अपयशी ठरल्याची टीका होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी कामचुकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचा पहिला बळी नगरसचिव मल्लेवाडे ठरले आहेत.
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला महापूर आला. निम्मे सांगली शहर पाण्यात गेले. या पुराचा सुमारे दीड लाख नागरिकांना फटका बसला आहे. 42 हजारांहून अधिक कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील आरसीएचच्या कार्यालयात, तर मिरजेतील मनपाच्या विभागीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू केले आहे.
शहरात उद्भवलेल्या या आणीबाणीच्या काळात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी टाकली होती; पण नगरसचिव बाळासाहेब मल्लेवाडे मात्र या कठीण प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे फिरकलेच नाहीत. मिरज येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडेही आयुक्तांनी चौकशी केली, तेथेही ते गेले नसल्याचे समोर आले. मल्लेवाडे हे नगरसचिव पदावर कार्यरत असून, ते महापालिकेचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात कामावर हजर राहणे आवश्यक होते. त्यांची वर्तवणूक ही कार्यालयीन शिस्तीस भंग करणारी आहे. त्यामुळे श्री. कापडणीस यांनी आज त्यांना निलंबित केले.
निलंबनकाळात मल्लेवाडे यांना सांगलीतील सामान्य प्रशासन विभागात उपस्थित रहाण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
महापुराच्या काळात महापालिकेची यंत्रणा अपयशी ठरली असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. काही अधिकाऱ्यांनी या आपत्तीच्या काळात आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.