सोलापूर : रोस्टरमध्ये एसईबीसी व खुल्या प्रवर्गातील पदे रिक्त नसल्याचे दाखविल्याने आता अन्य प्रवर्गातील 50 टक्केच पदे भरण्याचा घाट शिक्षण विभागाने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक भरतीचे नियमही तयार नाहीत. शिक्षण विभागाच्या या घोळामुळे भावी गुरुजींचे मागील आठ वर्षांचे स्वप्न आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण आहे.
शिक्षक होण्यासाठी राज्य सरकारने टीईटी उत्तीर्ण बंधनकारक केले. गुरुजी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमारे नऊ लाख उमेदवारांपैकी सव्वालाख विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले. 2013 पासून या भावी गुरुजींना भरतीची प्रतीक्षा आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनेकवेळा भरतीच्या घोषणाही केल्या. परंतु, आतापर्यंत भावी गुरुजींची स्वप्नपूर्ती झालेली नाही. आगामी निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण न केल्यास सरकारला हिसका दाखवू, असा इशारा डीएट-बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.
मागासवर्गीय पदांना कात्री -
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये एसईबीसी आणि खुल्या प्रवर्गातील पदे रिक्त नाहीत, अशा ठिकाणी अन्य प्रवर्गातील 50 टक्केच रिक्त पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. रोस्टरचा अडथळा असल्याचे सांगून भरती प्रक्रिया लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नोकरीच्या प्रतीक्षेतील टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
राज्याची स्थिती -
खासगी संस्थांची रिक्त पदे : 2,347
सरकारी शाळांमधील रिक्त पदे : 12,341
भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवार : 1.23 लाख
राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण केलेले नाही. उपसंचालक व शिक्षणाधिकारी स्तरावर दोन हजार शिक्षकांच्या मान्यतेच्या फायली पडून आहेत तर दुसरीकडे खासगी संस्था व सरकारी शाळांमध्ये साडेचौदा हजार पदे रिक्त आहेत. आगामी आठ-दहा दिवसांत भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आचारसंहितेची भीती आहे.
- दत्तात्रय सावंत, शिक्षक आमदार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.