सातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी

Congress
Congress

सातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा मतदारसंघातील असल्याने त्यांच्याऐवजी सातारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या निष्ठावंत व जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्याला संधी द्यावी, असा सूर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतून निघू लागला आहे. श्री. निंबाळकर यांना पर्याय नसेल तर आहे हीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

विविध कारणांनी काँग्रेसच्या नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत प्रचंड अस्वस्थता आहे. अशा बिकट परिस्थितीतही पक्षांतर्गत गटबाजी आजही मूळ धरून आहे. सध्या काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव वाढत आहे. किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, असा प्रयत्न मध्यंतरीच्या काळात झाला होता. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शविल्याने आमदार चव्हाण दुसऱ्या नावाच्या शोधात होते. त्यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव या पदासाठी निश्‍चित केले आहे; परंतु होणारा हा अध्यक्ष सातारा लोकसभा मतदारसंघातील असावा, असा संघटनेतील विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सूर आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड अपयश आले. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्मामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीला सहन केले. या सर्व परिस्थितीत पक्षसंघटनेतील उत्साहाचे वातावरण मावळले आहे. अशा परिस्थितीत नूतन अध्यक्ष हा पक्षसंघटनेत जान आणणारा, पक्षांतर्गत विविध गटांशी समन्वय साधून गोळा बेरीज करणारा असावा, अशी अपेक्षा आहे. 

पक्षसंघटनेत सुधारणा व्हायची असेल तर नवीन चेहरा अपेक्षित आहे. रणजितसिंह निंबाळकर हे १९७७ चे इंदिरानिष्ठ माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांचे पुत्र आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले होते. आपल्याशी पहिल्यापासून निष्ठावंत असल्याच्या एकमेव निकषावर त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावण्याची तयारी केली आहे, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यावर पक्षांतर्गत नाराजी दिसत आहे. त्यातच अध्यक्ष हा सातारा लोकसभा कार्यक्षेत्रातील असावा, असाच सूर सध्या जुन्या- जाणत्या पदाधिकाऱ्यांतून निघत आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर आहे हीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

...तर जिल्ह्यातही बाळसे! 
देशात काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असताना प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास जिल्ह्यातही काँग्रेस पुन्हा बाळसे धरू शकते; पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हवेत. माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर आणि मदन भोसले यांना पक्षात पुन्हा सक्रिय केल्यास त्यास गती येऊ शकते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मदन भोसले यांची भाजपसोबत ‘आँख मिचौली...’ सुरू असताना त्यांच्याच सल्ल्याने जिल्हा काँग्रेसचे बरेच निर्णय होतात, अशी कार्यकर्त्यांत धारणा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com