काँग्रेस संपविण्याची भाषा करणारेच संपतील - सुशीलकुमार शिंदे

वाई - ‘क्रांतिवीर किसन वीर जीवन दर्शन’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना सुशीलकुमार शिंदे. त्या वेळी विनायकराव पाटील, श्रीकांत वीर, रमाकांत वीर, डॉ. शैलेंद्र वीर आदी.
वाई - ‘क्रांतिवीर किसन वीर जीवन दर्शन’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना सुशीलकुमार शिंदे. त्या वेळी विनायकराव पाटील, श्रीकांत वीर, रमाकांत वीर, डॉ. शैलेंद्र वीर आदी.

वाई - ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीय मंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधीच बोलत नाहीत. उलट घटना बदलण्यासाठी प्रयत्न करतात, ही खेदाची बाब आहे.

 ज्या काँग्रेसने अतुलनीय त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ती संपविण्याची भाषा करणारेच एक दिवस संपून जातील. पंडित नेहरू, 
महात्मा गांधी, किसन वीर यांच्या समाजवादी विचारांची माहिती आज तरुण पिढीला होणे गरजेचे आहे, असे उद्‌गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

येथील साठे मंगल कार्यालयात डॉ. शैलेंद्र वीर संपादित ‘क्रांतिवीर किसन वीर जीवन दर्शन’ या पुस्तकाच्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी उद्योग राज्यमंत्री विनायकदादा पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, गोवा मुक्ती स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पतंगराव फाळके, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, कवठ्याचे सरपंच श्रीकांत वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा, सांगली जिल्हा स्वातंत्र्यवीर घडविणारी ‘फॅक्‍टरी’ होते. प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना आव्हान देणारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणूनच देशात ओळखला जातो. स्वातंत्र्याचा इतिहासही अलीकडच्या काळातील पिढी विसरायला लागली आहे. त्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाचे अजूनही संशोधन होणे गरजेचे आहे. देशाला समृध्दीकडे नेण्यासाठी नवीन पिढीला जुन्या पिढ्यांचा इतिहास माहिती असणे आवश्‍यक आहे. 

राजकारणात किसन वीरआबांचा दरारा मोठा होता. काहीकाळ वाट चुकलेली आमच्यासारखी माणसे त्यांनीच पुन्हा एकत्र आणली. मंत्र्यालाही खडे बोल सुनावण्याची ताकद त्यांच्यात होती. किसन वीर, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखी माणसे माझ्या आयुष्यात आल्यानेच माझे राजकीय करिअर घडले, असेही ते म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘आबासाहेब वीर ही कोणा एका कुटुंबाची संपत्ती नाही, तर ती महाराष्ट्राची संपत्ती आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे किसन वीरांचे खरे राजकीय वारसदार आहेत. आबा नसते तर ही माणसे घडली नसती. सध्या पक्षांमध्ये शिस्त व धाक दिसत नाही. परंतु, काँग्रेसमध्ये आबासाहेब आणि यशवंतराव यांचा मोठा धाक होता आणि तो त्यांच्या कर्तृत्वातून आला होता. आबांनंतर अनेक नेते पाहिले, पण आबा म्हणजे सर्वसामान्यांचे रॉबीनहूड होते.’’ या वेळी सतीश कुलकर्णी, सोपानराव घोरपडे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. 
डॉ. शैलेंद्र वीर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.

ॲड. संजय खडसरे, अल्पना यादव, सुनील करडे यांनी स्वागत केले. 
डॉ. जितेंद्र वीर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजयाताई भोसले, मोहन भोसले, शंकरराव पवार, डॉ. जे. बी. जमदाडे, नामदेवराव शिंदे, बापूसाहेब शिंदे, संदीप पोळ, अरुण पवार, प्रताप देशमुख, केशवराव पाडळे, विजयसिंह नायकवडी, आनंदराव लोळे, प्रदीप जायगुडे, विजया वीर, प्रा. सदाशिव फडणीस, यशवंत जमदाडे, अनिल जोशी, कृष्णराव डेरे, सूर्याजी पाटील, 
भानुदास पोळ, श्रीकांत डेरे, अतुल चौगुले, अतुल वाईकर, संदीप बाचल, विवेक शिंदे, कोल्हापूर येथील काकडे कुटुंबिय आदींसह नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com