हजारेंच्या न्यासाकडे प्रतिज्ञापत्रामुळे पाठ!

Anna-Hazare
Anna-Hazare

‘भ्रष्टाचार विरोधी’कडे केवळ ३०० जणांची नोंदणी; नव्या-जुन्यांच्या समन्वयाची गरज
सातारा - भ्रष्टाचाराला पायबंद बसावा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची स्थापना केली. एकेकाळी जिल्ह्यामध्ये मोठ्या दमाने कार्यरत राहिलेल्या या न्यासाकडे पाच हजार कार्यकर्ते होते. परंतु, नव्याने केवळ ३०० कार्यकर्त्यांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. केवळ कोणत्याही राजकीय पक्ष व संघटनेत सहभागी होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागत असल्याने अनेकांनी इच्छा असूनही हजारेंच्या न्यासात सहभागी होण्याकडे पाठ फिरवली आहे. 

आता न्यासातील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांत समन्वय घडवून पुन्हा संघटनेचे काम जोमाने सुरू होण्यासाठी काही जुने कार्यकर्ते अण्णा हजारेंना साकडे घालणार आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी आरटीआय कायदा व लोकपालसारखे विधेयक लोकसभा व विधानसभेत पारित करण्यास भाग पाडले. अण्णा हजारेंनी घेतलेल्या सर्व भूमिकांवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता लोकपाल विधेयक विधानसभेत पारित होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. अण्णा हजारेंचे काम प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या न्यासाच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते चालवत असतात. सातारा जिल्ह्यातही भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाने चांगले काम केले.

परिणामी यामध्ये सहभागी जुन्या कार्यकर्त्यांनी तब्बल चार हजार कार्यकर्ते जोडले होते. या संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी संघटनेत काम करण्यास इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले होते.

त्यावेळी जिल्ह्यातून साधारण ३०० जणांनी अर्ज केले होते. याचदरम्यान, न्यास नोंदणी कार्यालयाने संघटनेची नोंदणी रद्द केली. ही रद्द करताना त्यांनी एखाद्या न्यासाला ‘ॲन्टी करप्शन’चे काम करता येणार नाही, असा मुद्दा मांडला आणि संघटनेची नोंदणी रद्द केली होती. परिणामी या आदेशाला न्यायालयातून स्थगिती घेण्यात आली. तसेच न्यास नोंदणी कार्यालयाच्या आदेशालाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा संघटनेचे काम सुरू झाले. पण, जुन्या आणि नव्याने संघटनेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा समन्वय करण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यासाच्या कामाला गती मिळण्यासाठी नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. नव्याने कार्यकर्ते घेताना त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याचे व आगामी काळात कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. त्यामुळे संघटनेत काम करण्यासाठी येताना कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्राचा खर्च करावा लागणार आहे.

तसेच स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाशी संबंध ठेऊन लाभाचे पद घेता येणार नाही. या अडचणीमुळे न्यासामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com