नगर - पांगरमल येथील विषारी दारूकांड प्रकरणामध्ये पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी आज एका महिला उपनिरीक्षकासह तिघांना निलंबित केले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय सहा कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक अर्चना करपुडे, हवालदार आदिनाथ गांधले व भानुदास बांदल (नेमणूक तोफखाना पोलिस ठाणे) यांना निलंबित करण्यात आले. सहायक फौजदार शिवाजी धुमाळ, हवालदार नंदकिशोर काटे (एमआयडीसी पोलिस ठाणे), पोलिस नाईक शब्बीर शेख, रवींद्र लबडे, गणेश भिंगारदे (तोफखाना), जितेंद्र गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांची मुख्यालयात बदली करण्यात आली.
निवडणूक प्रचाराच्या काळात पांगरमल येथे विषारी दारू पिऊन नऊ जण मृत्युमुखी पडले. बनावट दारू तयार करणाऱ्यांना पोलिस, राज्य उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांचे पाठबळ असल्याचे चौकशीत उघड झाले. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी तीन अधिकारी व तीन कर्मचारी यांना निलंबित केले.
अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी झाली. त्यानंतर डॉ. त्रिपाठी यांनी निलंबन व बदलीचे आदेशकाढले. जिल्हा परिषद निवडणूक काळात वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कोणतीही ठोस कारवाई केली नाही; पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची गोपनीय माहिती काढली नाही व ती वरिष्ठांना कळविली नाही, आरोपी बनावट दारू तयार करून विकत असल्याची गंभीर घटना माहीत असून, त्याची वरिष्ठांना माहिती दिली नाही. त्यामुळे पांगरमलचे विषारी दारूकांड घडले, असा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवला आहे.
|