...अन् जंगलात माणसाचा वावर सुरू

Dajipur Sanctuary Open For Tourist
Dajipur Sanctuary Open For Tourist

कोल्हापूर - तब्बल सहा महिन्यांनी आज दाजीपूर जंगलाचा लोखंडी दरवाजा उघडला गेला. आणि गेले सहा महिने फक्त वन्यप्राण्यांचा बिनधास्त वावरत असलेल्या जंगलात आजपासून माणसांचा वावर सुरू झाला. अति पावसामुळे सहा महिने हे अभयारण्य बंद होते. आज सकाळी सात वाजता पहिल्यांदा जंगलातील वाटेने पर्यटकांच्या गाड्या गेल्या. आणि त्यांना जंगलाच्या हिरव्यागार छटा अनुभवताना गव्यांच्या, सांबरांच्या कळपाचे ही दर्शन घडले. बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहून पर्यटक क्षणभर थरारले. आणि ठिकठिकाणी झाडाच्या बुंध्यावर नखे ओरबाडल्याच्या खुणा करून अस्वलांनी ही ह्या जंगलात मोठ्या संख्येने वावर असल्याचे स्पष्ट केले. 

वनविभागाच्या नियमानुसार पावसाळा सुरू झाला की जंगलात लोकांना प्रवेश बंद होतो. दाजीपूर अभयारण्यात प्रवेश करायला ठक्‍याचा धनगरवाडा येथे मोठा लोखंडी दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे असलेल्या एकाच रस्त्यावरून वाहनांसह जंगलात जाता येते. त्यामुळे हा दरवाजा बंद केला, की जंगलात जाणारी वाट बंद होते. 

पर्यटकांनी अनुभवला बिबट्या, गव्याचा वावर

6 जून रोजी हा दरवाजा बंद झाला. साधारण 1 नोव्हेंबरला पुन्हा दरवाजा उघडला जातो. पण यंदा लांबलेला पाऊस व झालेला पाऊसही इतका तीव्र स्वरूपाचा होता. जंगलातल्या लाल मातीच्या रस्त्याची धूळधाण झाली. जंगलातून वाहून आलेल्या दगड गोट्यांचे थरावर थर या रस्त्यावर बसले. त्यामुळे 1 नोव्हेंबरला जंगलाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला व रस्त्याची डागडुजी महिनाभर डागडुजी सुरू होती. 
आज सकाळी सात वाजता पर्यटकांची पहिली बॅच जंगलात गेली. त्यावेळी त्यांना बिबट्याच्या, अस्वलांच्या पायाचे अगदी ताजे ठसे पहायला मिळाले. ठक्‍याचा वाडा धनगर वाडा जवळ झाडाचा मोठा बुधांच्या बुंधा अस्वलांनी ओरखडे काढून सोलला असल्याचे दिसून आले. पर्यटकांना ठिकाणी गव्याचे कळप चरताना दिसले. अर्थात वन्य प्राण्यांना सहा महिने मिळालेली मोकळी आज संपली. आणि शांतपणे जंगल न अनुभवता कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरडा करत थव्याचे थवे जंगलात जाणाऱ्या माणसांच्या वावराला मात्र सुरुवात झाली.

अस्वलांची संख्या वाढली 

सहा महिने जंगलात माणसांचा वावर व उपद्रव कमी असल्याने वन्य प्राण्यांना मात्र हे वातावरण पूरक होते. गवे, बिबटे, सांबर, भेकर व त्याहीपेक्षा अस्वलांना मोकळे रानच होते. दाजीपूर जंगलात अलीकडच्या काळात अस्वलांची संख्या वाढली आहे. पर्यटकांच्या पावलाचे ठसे व त्याचबरोबर अस्वलांच्या नखांनी अनेक झाडांचे बुंधे खरवडले गेले आहेत. 

पहिल्याच दिवशी ११० पर्यटक
पहिल्या दिवशी 110 पर्यटक जंगलात गेले. त्यापैकी बहुतेकांना गवे, सांबराचे दर्शन झाले. यावर्षी प्रथमच जंगल सहा महिने बंद होते. आजपासून ते पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाले. जंगलात निवाऱ्यासाठी असलेल्या तंबू निवासाची दुरुस्ती लवकरच केली जाईल. 
- प्रशांत तेंडुलकर, वनाधिकारी दाजीपूर अभयारण्य  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com