भूजल सर्वेक्षणाचा अहवाल; 1134 पैकी 741 नमुने अयोग्य
सोलापूर - सावधान, कदाचित तुम्ही पित असलेले पाणी आरोग्यास अपायकारक असू शकेल. भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेने केलेल्या रासायनिक तपासणीत जिल्ह्यातील 1134 पैकी 741 म्हणजे निम्यापेक्षा जास्त नमुने अयोग्य असल्याचे समोर आले आहे. बार्शीतील तर सर्वच नमुने अयोग्य असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्याची रासायनिक व जैविक अशा दोनप्रकारे तपासणी केली जाते. यासाठी वरिष्ठ भूजल सर्वेक्षण व विकास योजनेच्या बार्शी, अकलूज, करमाळा, पंढरपूर व सांगोला येथे उपविभागीय कार्यशाळा आहेत. या कार्यशाळांनी जिल्ह्यांतील सर्व तालुक्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये नायट्रेड व कठीणपणाचे प्रमाण जास्त आहे. रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा व जंतुनाशकांच्या अतिवापरामुळे पाणी दूषित होत आहे. पाण्यात नायट्रेडचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मुतखडा, अल्सर, दात वेडेवाकडे होणे, त्वचेचे विकार होतात. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
उपविभागीय कार्यशाळेने पाण्याचा रंग, गढूळपणा, लोह, वास, कठीणपणा, क्षार यासह 15 प्रकारच्या तपासण्या केल्या आहेत. यामध्ये नायट्रेडचे प्रमाण लिटरमागे 45 मिलीग्रॅम आवश्यक असताना 100 च्या दरम्यान असल्याचे समारे आले आहे. वर्षभरात नायट्रेडचे सर्वात जास्त म्हणजे 3202 व त्यानंतर कठीणपणाचे 1815 नमुने तपासले आहेत. याबरोबर विरघळलेले क्षार, अंमल, लोह, क्लेराईड, फ्लोराईड, सल्फेट व अल्कलनेटी हे नमुन तपासले आहेत.
रासायनिक खतांच्या अति वापरामुळे पाणी दूषित होत आहे. उन्हाळा व पावसाळ्यात याचे प्रमाण सतत कमी जास्त होते. प्रत्येक महिन्याला पाण्याचा रंग, गढूळपणा, लोह, वास आदींची तपासणी केली जात आहे.
- एस. एस. भुजबळ, रासायनिक, भूजल सर्वेक्षण व विकास विभाग (कार्यशाळा)
|