राळेगणसिद्धी - 'विज्ञान-तंत्रज्ञानात देश पुढे जात असताना निवडणुकीसाठी मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांचा पुन्हा वापर करावा, अशी मागणी करणे चूक आहे! ती देशाच्या प्रगतीला मागे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे,'' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
सध्या वापरात असलेल्या मतदान यंत्राऐवजी सर्व मतांचे एकत्रीकरण करणाऱ्या यंत्राचा वापर करावा, अशी सूचनाही हजारे यांनी केली.
विधानसभांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला आणि पंजाबमध्ये कॉंग्रेसला मोठे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदान यंत्राबाबत शंका घेतली. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. हजारे यांनी या शंका उपस्थित करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला.
हजारे म्हणाले, 'जगभरात अशा मतदान यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यावर संशय घेणे चुकीचे आहे. मतपत्रिका वापरणे कालबाह्य आणि वेळ वाया घालविणारे आहे. मतपत्रिका मोजण्यासही खूप वेळ लागतो. सध्याच्या गतिशील युगाला साजेशी ही मागणी नाही.''
'मतमोजणीनंतर कोणत्या भागात कोणाला किती मतदान होते हे समजू नये, यासाठी मत एकत्रीकरण यंत्राचा वापर करावा. त्यामुळे मतदानाच्या गुप्ततेचा भंगही होणार नाही. त्याबाबत मी सरकारकडे यापूर्वीच मागणी केली आहे,'' असेही हजारे म्हणाले.
|