पक्षाची दिशा ठरली; खासदारांनी त्यांची ठरवावी 

zp-satara
zp-satara

सातारा - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेऊ. जिल्ह्यात पक्ष कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची दिशा ठरली आहे. पक्षाच्या खासदारांनी त्यांची दिशा ठरवावी. कुणीही किती आघाड्या काढून आव्हाने दिली, तरी बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचीच सत्ता येणार, असा टोला पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आज लगावला. 

दरम्यान, येत्या गुरुवारी (ता. 12) अजिंक्‍यतारा कारखाना स्थळावर पक्षाचे नेते, खासदार शरद पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करून प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत, असेही शशिकांत शिंदे यांनी या वेळी सांगितले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी भवनामध्ये आज पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, सुधीर धुमाळ, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. 

शशिकांत शिंदे म्हणाले, ""सहा महिन्यांत जिल्ह्यात जे घडले त्याची दखल पक्षपातळीवर घेतली गेली आहे. आमचे नेते शरद पवार यांच्यापर्यंत जिल्ह्यातील घडामोडींची चर्चा झालेली आहे. 12 जानेवारी रोजी अजिंक्‍यतारा कारखाना कार्यस्थळावर पक्षाचा मेळावा होणार आहे. या वेळी अजिंक्‍यतारा कारखान्याच्या उपक्रमांचे उद्‌घाटन खासदार श्री. पवार यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात पक्षाची भूमिका पवारसाहेब जाहीर करणार आहेत. जिल्हा परिषदेतील अविश्‍वास ठराव, विधान परिषद निवडणूक याची दखल घेऊन पक्षात बंडखोरांना थारा दिला जाणार नाही. पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्यांनाच उमेदवारी मिळेल.'' 

29 डिसेंबरपासून जिल्ह्यात पक्षाचे तालुकावार मेळावे सुरू झाले आहेत. 18 जानेवारीपर्यंत मेळावे होतील. इच्छुक उमेदवारांसाठी अर्जाची विक्री 10 ते 14 जानेवारी सकाळी 11 ते 5 जिल्हा राष्ट्रवादी भवनामध्ये होणार आहे. इच्छुकांच्या मुलाखती 16 ते 18 जानेवारीपर्यंत होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस उलटून गेले, तरी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात सरकारला अपयश आले आहे. जनतेचे हाल थांबलेले नाहीत. त्याला वाचा फोडण्यासाठी येत्या सोमवारी (ता. 9) राष्ट्रवादीतर्फे राज्यभर ठिकठिकाणी "रास्ता रोको' करून आंदोलन करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

जे घडेल ते तेव्हाच कळेल 
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामराजे म्हणाले, ""राष्ट्रवादी पक्षाची दिशा ठरली असल्यामुळे त्यांनी त्यांची दिशा ठरवावी. कुणाच्याही दबावाखाली पक्ष नाही. मागच्या वेळी जे घडले ते आता या निवडणुकीत घडणार नाही. कुणाच्या ढवळाढवळ करण्याने मतदारसंघात फरक पडणार नाही. जे काही घडणार आहे ते वेळ आल्यावरच कळेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com