संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना आज सकाळी साडेआठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप 2.8 रिश्टर तीव्रतेचा असल्याची नोंद नाशिक येथील "मेरी' संस्थेच्या भूकंपमापन यंत्रावर झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बोटा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. वारंवार धक्के जाणवत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये अशाच प्रकारचे धक्के जाणवले होते. प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने सावधगिरी बाळगण्याचे धडे देत, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी तेथे मुक्कामही केला होता.
आज बसलेल्या धक्क्याची तीव्रता 2.8 रिश्टर असल्याची माहिती वरिष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली. भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अमोल निकम यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
|