सांगली - कोरोना, महापूर आणि बाजारपेठेत गडगडलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी (Farmer) आणि सामान्य नागरिक आधीच वैगागलेला आहे. अशा संकट काळात वीज कनेक्शन (Electricity Connection) तोडाल तर त्यांचा उद्रेक होईल, असा इशारा खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी आज येथे दिला.
महावितरणच्या विभागीय कार्यालयात अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांच्यासोबत बैठकीत ते बोलत होते. आमदार सुमन पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे नेते दीपक शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, हर्षवर्धन देशमुख, डॉ. प्रताप पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीतून खासदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढील दोन दिवसांत एक व्यापक बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.
खासदार पाटील म्हणाले, ‘‘शेतकरी आणि सामान्य नागरिकाची परिस्थिती बिकट आहे. वीज बील थकवण्याचा त्याचा इरादा वाईट नाही. कारण, पैसेच नाही. अशावेळी त्याच्यावरील संकटाची परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. वीज तोडणे हा पर्याय टोकाचा आहे. असे होत राहिले तर लोक संतापतील, रस्त्यावर उतरतील.’’
धर्मराज पेटकर म्हणाले, ‘‘महावितरण ज्यांच्याकडून वीज विकत घेत आहे, त्या कंपनीला गेल्या सहा महिन्यात काहीच पैसे दिलेले नाहीत. किमान चालू बिल द्यावे लागणार आहे. त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. अन्यथा कोणत्याही क्षणी ब्रेकआऊट होण्याची भिती आहे. त्यासाठी जिल्हाभरातील नेत्यांनीही सहकार्य करून वसुलीसाठी पुढाकार घ्यावा. लोकांनी स्थिती समजून घ्यावी.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.