कोल्हापूर - घरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. तो दुरुस्त करण्यासाठी थोडा जरी उशीर झाला तरी महावितरणच्या वायरमनवर तोंड सुख घेतले जाते. अशात महावितरणच्या अभियंते, वायरमन, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महापुराच्या काळात मात्र जोखीम पत्करून वीज दुरुस्ती काम झटपट करीत अनेक घरांत प्रकाश दिला. पाणीपुरवठा योजना सुरू केल्या. या महापूर काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वायरमनचे गावोगावी सत्कार व स्वातंत्रदिनी ध्वजवंदनाचा मान देत महावितरणवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. त्यामुळे कर्मचारीही भारावले आहेत.
दहा-पंधरा दिवसांत महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीतील बहुतांशी भाग जलमय झाला. महावितरणची वीजपुरवठा पूरक साधन सामग्री पुराच्या पाण्यात गेली. तीन लाख 42 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यात काही भागात खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित केला होता. काही भागातील वीजपुरवठा पुरामुळे खंडित झाला. सर्व वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात धोकादायक स्थितीत वीज जोडणी पूर्ववत सुरू करण्यासाठी यश मिळविले.
गावाभोवती पूर, नदी नाल्यांच्या पाण्याची फुग असूनही कर्मचारी पोहत, तर कुठे बोटीतून जाऊन वीज पुरवठा सुरू करीत होते. त्यांची धडपड अनेक गावकऱ्यांनी डोळ्यात देखत पाहिली. गावात वीज वीजपुरवठा सुरू झाला. पाणी योजना, शेतीपंपाची वीज सुरू झाली. या विषयी कृतज्ञता म्हणून सहा गावांत स्थानिक वायरमन किंवा बाहेरगावाहून तात्पुरत्या मदतीसाठी आलेल्या वायरमन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तर काही ठिकाणी गावातील महिलांनी वायरमनला राखी बांधली.
ग्रामपंचायतीच्या बैठकीत महावितरण कामाचे कौतुक करणारा ठराव झाला. त्याची लेखी प्रत महावितरणला पाठवली.
महापुराचा महावितरणला फटका
दोन जिल्ह्यात महावितरणची 32 उपकेंद्रे, साडेपाच हजारांवर रोहित्र, 300 हून अधिक खांब, 204 हून अधिक वाहिन्या, इन्शुलेटर, शेकडो डीपी बॉक्स पुराच्या पाण्यात गेल्याने 116 कोटींचे नुकसान.
-बाहेरच्या जिल्ह्यातून दीड हजार कर्मचारी, अभियंता बोलावले व स्थानिक कर्मचारी दिवसरात्र कामात होते. त्यांच्या जेवणाची राहण्याची सुविधा महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्यालयातून करण्यात आली.
- पूर ओसरल्यानंतरच्या अवघ्या तीन दिवसांत शहरातील शंभर टक्के, तर ग्रामीण भागातील 98 टक्के वीजपुरवठा सुरळीत. महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी काम.
- महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, संचालक विश्वास पाठक, दिनेशचंद्र साबू, मुख्य अभियंता अनिल भोसले, ग्रामीण अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, शहर अधीक्षक अभियंता नामदेव गांधले आदींच्या मार्गदर्शनाखाली वीज दुरुस्तीचे काम यशस्वी झाले.
|