सोलापूर - उसाच्या रसापासून इथेनॉल बनविण्याचा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात 27 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. इथेनॉल प्रकल्प पेट्रोलियम कंपन्यांना "बीओटी' तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावर आम्ही विचार करत असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
'सकाळ'च्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी "सकाळ' कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी झालेल्या चर्चेत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील विकासाची कामे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, की 27 डिसेंबरला मुंबईत होणऱ्या बैठकीसाठी सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, डिस्टिलरी कंपन्या, साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सध्या साखर कारखाने तोट्यात चालले आहेत. यावर मात करण्यासाठी कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीकडे लक्ष द्यायला हवे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांना "बीओटी' तत्त्वावर डिस्टिलरी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात केंद्राला साकडे घातले जाणार आहे.
|