नगर - 'शेतकरी-कष्टकरी-कामगारांच्या प्रश्नांचा सरकार आणि विरोधी पक्ष केवळ वापर करत आहे. ते सुटावेत, असे मात्र त्यांना वाटत नाही. आसूड यात्रेतून धडा घ्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाची किंमत सरकारला मोजावी लागेल. मागण्या मान्य न झाल्यास आसूड यात्रेनंतर नेत्यांच्या घरांवर मोर्चे काढू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला.
शेतकरी संघटना व प्रहार संघटना यांच्या आसूड यात्रेनिमित्त कडू येथे आले होते. त्या वेळी "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. "सत्ता गेली की शेतकरी, नि सत्ता असली की व्यापारी' असे सत्ताधारी व विरोधक यांचे सूत्र आहे, अशी टीका करून कडू म्हणाले, 'सत्ता कोणाच्या मतांनी येते, याचा विचार ते करत नाहीत. कारण, गर्भश्रीमंत नव्हे, तर गोरगरीब मते देतात, हा आतापर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव आहे. चांगला, दर्जेदार माल पिकत असेल, तर त्याला दर देण्याची सरकारची जबाबदारी आहे. येथे मात्र दर पाडले जातात. गरज नसतानाही आयात केली जाते. निर्यातबंदी मात्र कायम ठेवली जाते. शेतकऱ्यांची फसवणूक करणे, गोरगरिबांना न्यायापासून वंचित ठेवणे, हाच सरकारचा आणि विरोधकांचा उद्योग आहे.''
पिकवावे; पण विकू नये!
कडू म्हणाले, 'शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यांच्या संपाचा विषय आता समोर येत आहे. व्यवस्थित नियोजन न केल्यास सरकारमधील काही लोक तो मोडून काढतील. शेतकऱ्यांनी पिकवावे; मात्र विकू नये आणि विकू देऊही नये. त्यासाठी एकसंघ ताकद तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा पुढाकार असेल.''
|