शेत जमीनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून

शेत जमीनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून

जत तालुक्‍यातील प्रकार : दोन गटात जोरदार हाणामारी

जत (सांगली): सिंदूर (ता. जत) येथे शेतबांधाच्या वादातून दोन गटात काठ्या, कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी होऊन पिरगोंडा रुद्रगौडा पाटील (वय 55) या शेतकऱ्याचा खून झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. 26) सकाळी नऊ वाजता घडला. दरम्यान हा खून पवनचक्‍की कंपनीच्या प्रतापामुळे घडल्याचीही चर्चा रंगली आहे.

याबाबत माहिती अशी, पाटील व हिप्परगी यांच्या शेतजमीनीच्या बांधावरुन वाद आहे. जमीनीची मोजणी न झाल्याने बांध कोणाच्या शेतात येतो हे स्पष्ट झाले नव्हते. आठ दिवसापूर्वी हिप्परगी यांनी जेसीबीने बांध फोडला असल्याचा संशय पाटील यांना होता. यावरुन दोघांत दोन वेळा वाद झाला. गुरुवारी झेंडा वंदन करुन पिरगोंडा पाटील बसस्थानकावर आले. त्याचवेळी गुराप्पा हिप्परगीही तिथे होते. दोघांत पुन्हा वाद उफाळून आला. वादातून दोघात मारामारी झाली. हिप्परगी यांना जास्त मार लागल्याने ते संतापून घरी गेले. त्यांनी सर्व नातेवाईकांना गोळा केले. काठया, कुऱ्हाडी व गज घेवून पुन्हा बसस्थानकावर आले. तोवर पाटीलही नातेवाईकांना घेवून तयारीतच होते. दोन्ही गटात तुंबळ मारामारी सुरु झाली. एकमेंकांवर चाल करीत काठया, कुऱ्हाड व गजने एकमेंकांवर घाव घातले. यात दोन्ही बाजूचे आठजण जखमी झाले. पिरगोंडा पाटील यांना कुऱ्हाडीचा घाव वर्मी बसल्याने ते जागेवरच कोसळले. रुग्णालयात घेवून जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शिवकांत पाटील, गौडाप्पा पाटील, चिदानंद मदभावी, मारुती मदभावी, आप्पासाहेब पाटील हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारार्थ मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत शिवकांत पिरगोंडा पाटील यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुराप्पा बाळाप्पा हिप्परगी, सिध्दा बाळाप्पा हिप्परगी, शंकर बाळाप्पा हिप्परगी, सदाशिव गुराप्पा हिप्परगी, बाळाप्पा गुराप्पा हिप्परगी, गिरमल्ला सिध्दाप्पा हिप्परगी, मल्लिकार्जुन शंकर हिप्परगी, सुरेश नंदयाप्पा मुडशी, रामू धानप्पा माडग्याळ व बंदव्वा शंकर हिप्परगी यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

पवनचक्‍की कंपनीच्या प्रताप-
ही घटना पाटील व हिप्परगी यांच्या जमीनीच्या बांधावरुन झाल्याची पोलिसांत नोंद आहे. परंतु, एका पवनचक्‍की कंपनीने रस्ता तयार करताना बांध फोडल्याची चर्चा आहे. हिप्परगी यांनी पनचक्‍की कंपनीला जमीन विकली आहे. या जमीनीकडे जाण्यासाठी कंपनी रस्ता तयार करीत आहे. अरुंद रस्ता होत असल्याने त्यांनी हा बांध फोडला. तक्रारीत असलेला बांध फोडल्याने पाटील संतापले. हिप्परगी यांनीच बांध फोडल्याचा संशयाने त्यांच्याशी वाद झाला व त्यातून हा प्रकार झाला. सदरच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचेही कबूल केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com