अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस; मुलींची प्रकृती खालावली

अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस; मुलींची प्रकृती खालावली

पुणतांबा(नगर) - पुणतांबा गावात गेल्या पाच दिवसापासून कृषी कन्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. निकिता जाधव, पुनम जाधव शुभांगी जाधव या मुलींची तब्येत खालवली असून रात्री उशिरा शुभांगी जाधवला अस्वस्थ वाटत असल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्या मुलींनी सांगितले आहे.

राम शिंदे यांनी आंदोलकर्त्यांसोबत घेतलेली बैठक निष्फळ ठरली असून मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोल मागे घेणार नाही असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.

दरम्यान, एक लॉ करते. इतर दोघी बीएसस्सी करताहेत. अवघ्या 19 ते 20 वयोगटातील त्या तिघींनी पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अडून बसल्या आहेत. ज्या पुणतांब्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आंदोलन गाजविले, त्याच पुणतांबे (ता. कोपरगाव) येथून या कृषीकन्येचा जागर म्हणजे शेतकरी कुटुंबातील युवतींचा एल्गार समजला जातो.  शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पुनम राजेंद्र जाधव या पुणतांबे येथील तिघीही 19 ते 20 वयोगटातील युवती. तिघींनीही पाच दिवसांपूर्वी पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन (उपोषण) सुरू केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणला उपोषण सुरू असतानाच या तिनही मुली उपोषणाला बसल्या. हे आंदोलन गाजत असल्याने या तिघींकडेही प्रशासनाचे विशेष लक्ष गेले नाही. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला. ग्रामस्थांनी भीकमांगो आंदोलन केले. परंतु तरीही प्रशासनाने त्यांची विशेष काळजी घेतली नाही. काल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांची भेट घेवून सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या योजनांची माहिती दिली. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु त्या आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काल तिघींपैकी शुभांगी हिला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. 

पुणतांब्याचा आंदोलनाचा इतिहास
दुधाला वाढीव दर मिळावा, यासाठी पुणतांबे येथून शेतकरी आंदोलनाने महाराष्ट्राला धडा दिला. किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली हे आंदोलन झाले. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामध्ये धनंजय जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाधव यांच्या निकिता हीने  वडिलांचा कित्ता गिरविला. युवतींना संघटित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढ्यास ती उभी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात पुणतांब्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com