करमाळा - सर्वत्र शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत होत असताना धायखंडी (ता. करमाळा) येथील शिक्षकांची बदली झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनीच शाळेला कुलूप ठोकले आहे, तर पूर्वीचे शिक्षक शाळेत रुजू होईपर्यंत भावबंद, चूलबंद, शाळाबंद आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
नुकत्याच झालेल्या बदल्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धायखंडी (ता. करमाळा) येथील सहशिक्षक मच्छिंद्र बिनवडे, शिवलाल शिंदे, दत्तात्रय सांगडे या तिन्ही शिक्षकांची नोकरी या शाळेत पाच वर्षांपेक्षा कमी झाली आहे. सरकारच्या बदली नियमात हे शिक्षक बसत नसतानाही त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ताही सुधारली आहे. आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांची आठवण काढून रडत होते. सकाळी शाळा भरण्याच्या वेळी सर्व गावकरी शाळेत जमा झाले होते. बदली होऊन आलेल्या शिक्षकांना शाळा उघडू दिली नाही. नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
|