कोल्हापूर - माजी महापौर व कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतले ज्येष्ठ व्यक्तिमत्व भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय76) यांचे आज पहाटे निधन झाले. कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, शिवाजी तरुण मंडळ, राजश्री शाहू कृतज्ञता परिषद, बाल कल्याण संकुल, अशा विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
कोल्हापूरच्या राजकीय-सामाजिक सांस्कृतिक घडामोडीत समरस झालेले व्यक्तिमत्व म्हणून भिकशेठ पाटील साऱ्या शहराला परिचित होते.
कोल्हापुरातील शिवाजी पेठ म्हणजे सामाजिक आणि राजकीय चळवळीचे धगधगते केंद्र. या पेठेतच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली त्यांचे वडील झाडू कामगार होते. त्यामुळे त्यांनी सामाजिक विषमतेचे आणि गरीबीचे चटके लहानपणापासूनच अनुभवले. मात्र त्यातून त्यांनी प्रेरणा घेत सामाजिक कार्यात उडी घेतली व भिकशेठ पाटील या नावाचे एक वेगळे वलय निर्माण केले. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. या मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे ते प्रमुख होते.
1985 साली महापालिका निवडणुकीत शिवाजी पेठेतून निवडून आले. त्यानंतर 1990 साली अटीतटीच्या लढतीत ते पुन्हा निवडून आले व कोल्हापूर शहराचे महापौर बनले. एक साधा माणूस महापौर पदावर विराजमान झाल्यावर त्याची प्रतिष्ठा कशी वाढवतो याचे भिकशेठ पाटील हे उदाहरण ठरले. राजश्री शाहू दूरदर्शन मालिकेचे ते प्रमुख घटक होते मालिकेसाठी शाहूकालीन वास्तु वस्तू शोधण्यासाठी त्यांनी फार मोठी धडपड केली. गेले काही वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत होते आज पहाटे त्यांचे निधन झाले.
|