शेतकरी सहकारी संघाचे चार अधिकारी निलंबित

शेतकरी सहकारी संघाचे चार अधिकारी निलंबित

कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ येथील शाखेत खत, मिश्रखत तसेच इतर साहित्य परस्पर विक्री करून, ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार झाल्याचे तपासणीमध्ये उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी दोषींची सखोल चौकशी करण्यासाठी शिरोळ शाखा अधिकारी अमर गुरव, तपासणी प्रमुख दीपक देसाई, निरीक्षक प्रकाश काळे आणि शहाजी जाधव यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला. या अपहाराला जबाबदार धरून मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब निर्मळ यांनाही निलंबित करून निकोप चौकशी करण्याची मागणी संचालक मानसिंग जाधव, शोभना नेसरीकर आणि व्यंकाप्पा भोसले यांनी केली आहे.

शेतकरी संघ फायद्यात यावा, यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे; मात्र शिरोळमधील शाखेतून खत, मिश्रखत तसेच साबण-सोड्याची परस्पर विक्री करून ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे व्यवस्थापक अप्पासाहेब निर्मळ यांनी शुक्रवारी 
(ता. ११) संघाच्या सर्व शाखांतील खत आणि रॉकेल साठा तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, दोन दिवसांपासून प्रकरण वाढत गेल्याने अध्यक्ष अमरसिंह माने यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती नियुक्त केली. दोन दिवस झालेल्या चौकशीमध्ये ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार झाल्याचे उजेडात आले.

दरम्यान, अपहारामध्ये कोणा-कोणाचा आणि कसा सहभाग आहे, याची चौकशी करण्यासाठी अमर गुरव, तपासणी प्रमुख दीपक देसाई व निरीक्षक प्रकाश काळे आणि शहाजी जाधव यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला. चौकशीनंतर दोषींवर फौजदार गुन्हा आणि अपहाराची सर्व रकमेची वसुली करण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या सर्व अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मुख्य व्यवस्थापकांची होती; पण त्यांनी कर्तव्यात कसूर केली, असा ठपका ठेवत ज्येष्ठ संचालकांनी मुख्य व्यवस्थापकांच्या निलंबनाचीही मागणी केली आहे. 

संघाचे मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब निर्मळ म्हणाले, ‘‘व्यवस्थापकांना पदावरून हटविण्याची मागणी केली असल्याची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. शिरोळ शाखेत खतांचा शिल्लक साठा कमी झाल्याचे लक्षात येताच ११ जानेवारीलाच संघाच्या सर्व शाखांमधील खत आणि रॉकेल साठा तपासण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, शिरोळमधील खतांचा अपहार झाल्याचे लक्षात येताच त्याची सखोल चौकशी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. साठा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापक म्हणून आपल्यालाही चुकीचा अहवाल दिला होता. आता मात्र हा अपहार लक्षात आला आहे. संचालक मंडळ दोषींवर निश्‍चितपणे कारवाई करेल.’’

असा झाला अपहार
शिरोळ शाखाप्रमुख अमर गुरव यांनी शाखेतील खत घट्ट झाले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिरोळ शाखेत खतांची मागणी केली. दरम्यान, नवीन खत पाठविल्यानंतर जुने खत परत पाठविले नाही. तपासणी अधिकारी किंवा निरीक्षकांनीही याचा अहवाल दिला नाही. दरम्यान, शिल्लक किंवा घट्ट झालेले खत गुरव यांनी परस्परच कर्नाटकमध्ये विक्री केल्याचे उघड झाले आहे. एकीकडे खत शिल्लक नसताना तपासणी अधिकारी, निरीक्षक यांनी खतांचा साठा शिल्लक असल्याचा चुकीचा अहवाल व्यवस्थापकांकडे पाठविल्याचे तपासणीत उजेडात आले आहे. 

ज्या-ज्या अधिकाऱ्यांनी अपहार करून रक्कम हडप केली आहे, त्या-त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला. निलंबित करून निकोप चौकशी करावी, तसेच दोषींवर फौजदारी करण्याचा आणि अपहाराची रक्कम वसूल करण्याचा एकमताने निर्णय झाला आहे. 
- अमरसिंह माने,
अध्यक्ष, शेतकरी संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com