गदिमा जन्मशताब्दीः नित्य नांदो खेडे माझे धरून संतसंगा...

गदिमा जन्मशताब्दीः नित्य नांदो खेडे माझे धरून संतसंगा...

आटपाडी - गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकरांचे जन्मशताब्दी वर्ष उद्या (ता. १) पासून सुरू होत आहे. शेटफळे हे गदिमांचे जन्मगाव तर माडगुळे, आटपाडी, पुणे ही कर्मभूमी. या गावांची आपल्या खास शब्दांत ओळख करून देताना गदिमांनी ‘माझा गाव’ ही गविता गुंफली. त्यात ‘नित्य नांदो खेडे माझे धरुन संतसंगा’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या जन्मभूमी, कर्मभूमीला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात खूप काही अपेक्षा आहेत. येथे गदिमांच्या आठवणींचा ठेवा खास रूपात जतन करून ठेवावा म्हणून राज्य सरकारने पाच कोटींची तरतूदही केली आहे. या वर्षभरात हे काम मूर्तरूपात येईल, अशी इथल्या मातीतील गदिमांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणदेशी माणसांची अपेक्षा आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविलेल्या गदिमांचे सन २०१८-२०१९ हे जन्मशताब्दी वर्ष. राज्य शासन ते विविध उपक्रमाने साजरे करते आहे. ते दिशादर्शक ठरतील, अशी अपेक्षा ठेवून सारी माणदेश भूमी उत्साहात आहे. ग. दि. माडगूळकर यांचे आजोळ शेटफळे. येथेच त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माची तेवढीच रोचक कथा आहे. ‘तीळही नाही खेड्याला या पहिला इतिहास... शिल्पकलेची, ताम्रपटाची कशास मग आस?’ असे गदिमा विचारतात. त्याच गदिमांमुळे हे गाव प्रसिद्ध पावले. जन्मभूमीत स्मारक उभा राहावे, यासाठी १९९२ मध्ये स्थानिक मंडळींनी समिती स्थापन करून लढा सुरू केला. तपाच्या लढ्यानंतर स्मारक उभारले, मात्र अपुरे. दोन तपांपासून गदिमांची जयंती ‘पारावरील साहित्यिकांचा मेळावा’ घेऊन साजरी होतेय. अपूर्ण कामे मार्गी लागण्याबरोबरच स्पर्धा परीक्षा केंद्र, ग्रंथालय, गाण्यांच्या ध्वनिचित्रफितींचे संग्रहालय व्हावे, अशी अपेक्षा आहे.
 
कर्मभूमीला प्रतीक्षा
गदिमांचे मूळ गाव माडगुळे. तेही उपेक्षितच. माडगुळे, आटपाडी आणि पुण्याशी त्यांची नाळ जोडलेली. गदिमा खास लिखाणासाठी गावी येत. या काळात त्यांचा शेतातील पत्र्यावर मुक्‍काम असायचा. त्याला ‘बामणाचा पत्रा’ संबोधतात. बहुतांश लेखन येथेच केले. या वास्तूत वेगळा स्पार्क आहे. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी तेथे भेट दिली आहे. ही वास्तू विकसित करण्याची २००३ मध्येच घोषणा केली होती; मात्र आजअखेर तोही उपेक्षितच राहिला.

दखल घ्या
सन २००३ मध्ये स्मारक उभारण्यावरून वाद झाला. त्यावेळी शेटफळेनंतर आटपाडी, पुण्यात स्मारकाची घोषणा केली गेली. आटपाडी हे तालुक्‍याचे आणि माणदेशाचे मध्यवर्ती ठिकाण. माणदेशाने मराठी साहित्याला दिगग्ज लेखक दिले. येथे सुसज्ज ग्रंथालय आणि नाट्यगृह उभारण्याची मागणी आहे. आमदार अनिल बाबर यांनी त्यासंदर्भात पाहणी केली. पुण्यातही स्पर्धा परीक्षा केंद्र, ग्रंथालय-स्मारक उभे केले जावे, अशी पुणेकरांची आग्रही मागणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com