अनामत रक्कम, प्रशासकीय कागदपत्रांत कार्यारंभास उशीर
नगर : नगर शहरातील कचरासंकलन व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर वळणावर आहे. महापालिका स्थायी समितीने शहरात कचरासंकलनाचे काम पुण्याच्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या एजन्सीला काम देण्यासाठी महापालिकेकडूनच विलंब होत आहे.
त्याबाबत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेस सोमवारी जाब विचारला. त्या वेळी एजन्सीला बुधवारपासून काम सुरू करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, अशी ग्वाही महापालिकेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, त्यानंतरही केवळ अनामत रक्कम, प्रशासकीय कागदपत्रे व कार्यारंभ आदेश यात अक्षम्य हलगर्जीपणा होत आहे.
त्यातच शहरातील कचरासंकलनासाठी महापालिकेकडे पुरेशी वाहनेही नाहीत. त्यामुळे कचरासंकलन अवघड झाले असून, त्याचा नगरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, अशी स्थितीही निर्माण होण्याची भीती कायम आहे.
दरम्यान, महापालिकेने नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात 70 घंटागाड्या, चार ट्रक, एक जेसीबी, चार कॉम्पॅक्टरचा समावेश आहे. या वाहनखरेदीसाठी 28 कोटींचा निधी केंद्राकडून महापालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, या वेळी शहरातील कचरा रॅम्प बंद केल्याने कचरा
कोंडीची समस्या निर्माण झाली.
वाहनांची खरेदी होईपर्यंत पुण्याच्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टला कचरासंकलनाचा ठेका देण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. "स्वयंभू'ला एक हजार 650 रुपये प्रतिटन दराने कचरासंकलन करण्याचा ठेका दिला. दोन महिन्यांत शहरातील कचरा व अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या दोन्ही उपायुक्तांना बरोबर घेत शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला.
रस्त्याच्या कडेला कचरा पडून आहे. पावसाळ्यात हा कचरा कुंड्यांतच सडतो. कचराकुंड्या व कचऱ्याच्या ढिगातून दुर्गंधी येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वयंभू ट्रान्स्पोर्टने 15 डंपर व महापालिकेचे तीन जेसीबी शहरातील कचऱ्याचे ढीग हटविण्याचे काम करीत आहेत.
महापालिकेत लाल फितीचा कारभार
शनिवारपर्यंत शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी आमदार जगताप यांच्यासमोर मान्य केले होते. तथापि, आज सायंकाळपर्यंत ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश मिळाले नव्हते. ठेकेदार संस्थेने 75 लाख 87 हजार रुपयांची अनामत रक्कमही महापालिकेकडे दिली आहे. ही ठेकेदार संस्था शहरात 45 वाहनांतून कचरासंकलनाचे काम करणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन वाहने मिळणार असल्याने कचऱ्याची समस्या सुटण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून कचरासंकलनाचे काम लाल फितीत अडकविण्यात येत असल्याची चर्चा शहरात आहे.
|