कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात राजकीय धुळवड

कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात राजकीय धुळवड

कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राजाराम सहकारी साखर कारखान्यासह जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा याच आठवड्यात होत आहे. या सभा होण्यापूर्वीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर या तिन्ही संस्थांच्या सभांचे पडसाद उमटणार आहेत. या निमित्ताने आठवड्यात राजकीय धुळवड रंगणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात या ना त्या कारणाने राजकीय संघर्ष वाढत आहे. लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे, विधानसभेसाठी जोडण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षीच्या सर्वसाधारण सभांना महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर आमदार हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये उद्या (ता. २७) या जिल्हा बॅंकेची सभा आहे. यापूर्वीच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बॅंकेतील व्यवहारांवर भाष्य केले आहे. दुबई सहलीसह इतर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे या सभेलाही राजकीय किनार लाभली आहे.

राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २८) होत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे तेथे वर्चस्व आहे. जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेसमोरील मल्टिस्टेटच्या मुद्द्यांवरून सध्या जिल्ह्यातील राजकारणाला उकळी फुटली आहे. त्यातूनच राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना संपर्क सभेत मारहाण झाली. त्यानंतर महाडिक यांना कसबा बावडा बंद करण्याच्या इशाऱ्याने जिल्ह्याचे राजकारण तापले. 

आता श्री. नेजदार कसबा बावड्यातील आठ-नऊशे सभासद घेऊन ‘राजाराम’च्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 
जिल्ह्याचा आर्थिकच नव्हे तर राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभाही रविवारी (ता. ३०) होत आहे. सभेच्या जागेपासून गोपनीय मतदानापर्यंतचे मुद्दे गाजत आहेत. काही मुद्दे न्यायालयात पोचले आहेत. आमदार सतेज पाटील यांनी मल्टिस्टेटला केलेल्या विरोधात खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांनी बळ भरले आहे. माजी आमदार पी. एन. पाटील महाडिक यांच्या भूमिकेसोबत आहेत. त्यामुळे येथेही संघर्ष पहावयास मिळणार आहे. 

ऊस परिषद महत्त्वाची
खासदार राजू शेट्टींच्या ऊस परिषदेकडे जिल्ह्याचे लक्ष असते. ही परिषद पुढील महिन्यात होणार आहे. शेट्टी यांचे ऊस परिषदेतील भाषण म्हणजे राजकारणाची आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ समजली जाते. आगामी लोकसभा निवडणूक आणि भाजपमधून घेतलेली फारकत यावरील भाष्य या परिषदेत नक्कीच ऐकायला मिळेल.

आगामी राजकारणाची झलक
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या राजकारणाचे संकेत ‘गोकुळ’च्या होऊ घातलेल्या सभेत दिसत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. आरोप करताना त्यांनी पातळी ओलांडू नये, अशी अपेक्षा आहे. मात्र, तीच या सभांतून ओलांडली जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com