कर्नाटक सरकारची मराठी साहित्य संमेलनावर बंदी कायम...

कर्नाटक सरकारची मराठी साहित्य संमेलनावर बंदी कायम...

निपाणी ( बेळगाव) - येथील साहित्य रसिक मंडळाकडून १८ व १९ जानेवारीला आयोजित मराठी साहित्य संमेलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली. संमेलनाच्या परवान्यासाठी शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ. बोम्मनहळ्ळी व जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची भेट घेतली. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती व वरिष्ठ प्रशासन पातळीवरुन आदेशाचे कारण देत परवानगी नाकारली. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा संयोजकांनी निषेध करून नजीकच्या महाराष्ट्र हद्दीतील अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रा. डॉ. अच्युत माने व संयोजकांनी दिली.

 जिल्हा पोलिस प्रमुखांनी हट्ट सोडला नाही

याबद्दल डॉ. माने म्हणाले, ‘साहित्य संमेलनाची तयारी ताकदीने सुरु आहे. पण कर्नाटक प्रशासनाने परवान्याचा अडथळा आणला. परिणामी आज आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 
परंतु त्यांनी नकारात्मक भूमिका बदलली नाही. भाषिक वादातून जो तणाव निर्माण झाला, त्या पार्श्‍वभूमीवर संमेलन पुढे ढकलावे, अशी त्यांची विनंती होती. दरम्यान आम्ही त्यांच्या नियम, अटींसह संमेलन पार पाडण्याची तयारी दाखवली. तसे लेखी देण्याची ग्वाही दिली, पण दोघेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. चर्चेवेळी स्थानिक आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. त्यांच्या समोर चर्चा घडली तरीही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांनी हट्ट सोडला नाही.’ यावेळी डॉ. सी. बी. कुरबेट्टी, प्रा. विभावरी खांडके, गोपाळ नाईक, गणी पटेल, विठ्ठल वाघमोडे, हरीष तारळे, अस्लम शिकलगार, जयराम मिरजकर, डॉ. उमेश रेणके, अजय माने, सुरेश गौराई, प्रा. शरद कांबळे यांच्यासह संयोजक उपस्थित होते.

ठरलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत संमेलन

संमेलनाची तयारी पूर्ण असल्याने संमेलन रद्द न करता अथवा ते पुढे न ढकलता नियोजनानुसार व ठरलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत देवचंद महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात होईल. कर्नाटक प्रशासनाकडून चाललेली दंडुकशाही व अडवणूक लक्षात घेऊन संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. माने यांनी केले.

महाराष्ट्रासह इतर प्रांतातील कुणाही साहित्यिक, लेखक, कवी यांना आणायचे नाही, अशी प्रशासनाची अट होती. रविवारी दंडुकशाहीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांना बेळगावात संमेलनस्थळी प्रशासनाने पोहचू दिले नाही. तशीच भूमिका त्यांची आजही होती. यामुळे प्रशासनाच्या धोरणाचा आपण तेथेच निषेध केला.
-प्रा. डॉ. अच्युत माने 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com