गावगाडा थबकला ; ग्रामसेवकांचे आंदोलनात 1490 ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प 

गावगाडा थबकला ; ग्रामसेवकांचे आंदोलनात 1490 ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प 

सातारा ः जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिल्याने ग्रामीण गावगाडा थबकला आहे. दाखले देण्यापासून ते निविदा काढण्यापर्यंतची कामे रखडली आहे. ग्रामसेवकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली असून, लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील एक हजार 490 पैकी कंत्राटी ग्रामसेवक असलेल्या मोजक्‍या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरू आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. 

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावे, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बंद करून पदवीधर ग्रामसेवक नेमणूक करावी, ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढवावीत, वेतन त्रुटी दूर कराव्यात, 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर यांना आगाऊ वेतनवाढ करावी, एक गाव एक ग्रामसेवक पद निर्मिती करावी, ग्रामसेवकांची अतिरिक्‍त कामे कमी करावीत, या मागणीसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी नऊ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. 

या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषदा आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, ग्रामविकास विभाग आणि ग्रामसेवकांच्या संघटनांची बैठका केल्या. त्यामध्ये सकारात्मक निर्णय झाले. मात्र, त्याबाबत लेखी आश्‍वासन दिले नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. 23 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांना मंजुरी देणे, त्यांची निविदा प्रक्रिया राबविणे, टेंडर मंजुरी देऊन ते कामे सुरू करणे आदी कामे ठप्प झाली आहेत. याशिवाय, लोकांना दाखले देणे, उतारे देणे, नोंदी करणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे आदी कामे पूर्णपणे थांबविली आहेत. परिणामी, लोकांचीही गैरसोय होत आहेत. 


विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमध्ये विविध कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू असताना ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प आहे. सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तत्काळ आंदोलनातून मार्ग काढावा.

जावेद मुल्ला, सरपंच, तांबवे (ता. कऱ्हाड). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com