नगर - कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्यभावनेने मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्त जनतेसाठी राज्यातील ग्रामसेवक एक दिवसाचे वेतन देणार आहेत. ग्रामसेवक संघटनेने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देऊन एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री साह्यता निधीत जमा करण्याची विनंती नुकतीच केली.
या मदतीतून सुमारे तीन कोटी रुपयांची मदत ग्रामसेवक संवर्गाच्या माध्यमातून जमा होणार आहे. सध्या पूरग्रस्त भागातील मदतकार्यात ग्रामसेवक संघटनेच्या शाखा कार्यरत असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.
किल्लारी भूकंप, केरळमधील पूर परिस्थितीतही ग्रामसेवकांनी मदत करून योगदान दिले होते. राज्यातील जलयुक्त शिवार अभियान, दुष्काळनिवारण अशा कामांसाठीही संघटनेने वेळोवेळी मदत केली आहे. देशाप्रती व समाजाप्रती संवेदना जागृत असलेला ग्रामसेवक संवर्ग कर्तव्यापलीकडे जाऊन योगदान देत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ढाकणे यांनी सांगितले.
|