सोलापूर - लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघात किती दिव्यांग आहेत, ते कुठे राहतात, याची माहितीच उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांची गैरसोय होणार, असे चित्र पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणणे आणि त्यांना सुखरूप घरी पोहचविणे, ही जबाबदारी शासकीय यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. तसेच, याचा खर्चही शासन करणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात 29 लाख 69 हजार दिव्यांग होते. त्यानंतर किती वाढले अथवा कमी झाले, याची माहिती संकलित केली नसून, जिल्हास्तरावर ही माहिती उपलब्ध असू शकेल, असे अपंग आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, दिव्यांग मतदारांची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची जिल्हा प्रशासनाकडून सोय होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माझ्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील दिव्यांग मतदारांबाबत मेडिकल कॉलेज, एनजीओ अथवा जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली. परंतु, एकत्रित माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आता अपंग कल्याण आयुक्त कार्यालयाकडून माहिती मागवून नियोजन केले जाईल.
- डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर
|