पारनेर - राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्य सरकारने अविकसित व कमी आरोग्य सुविधा असणाऱ्या 17 जिल्ह्यांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रे (हेल्थ वेलनेस सेंटर) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत या जिल्ह्यांतून निवडलेल्या गावांत स्वतंत्र आरोग्य अधिकारी नेमले जाणार आहेत. त्यासाठी नव्याने त्यांची नियुक्ती केली जाईल.
त्यामुळे पुढील काळात दुर्गम व ग्रामीण भागातील जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळू शकतील. दरम्यान, नगर जिल्ह्यातील फक्त पारनेर तालुक्यातीलच 35 गावांची आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी निवड झाल्याचे समजले.
आरोग्य सुविधांची कमतरता असणाऱ्या ठिकाणी हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्यांची आरोग्याबाबत होणारी हेळसांड थांबणार आहे. या केंद्रासाठी राज्यातील 17 जिल्ह्यांतून 70 तालुके व त्यातून 1336 गावांची निवड केली आहे. या केंद्रासाठी किमान "एमबीबीएस' पदवीधारक डॉक्टर नेमला जाणार आहे. त्यासाठी अर्जही मागविले आहेत. निवड झाल्यानंतर या डॉक्टरांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना एक परीक्षा द्यावी लागेल. त्यात यशस्वी झाल्यानंतरच डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. अर्थात, ही नियुक्तीही तात्पुरत्या स्वरूपात असेल, अशी अट आहे. प्रशिक्षण काळात डॉक्टरास 10 हजार रुपये शिक्षणभत्ता मिळेल. प्रत्यक्ष केंद्रावर नियुक्ती झाल्यानंतर 25 हजार रुपये पगार व सुमारे 15 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनभत्ता देण्यात येणार आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर
जिल्हे- 17
तालुके- 70
केंद्रे-1336
मंजूर केंद्र असलेले जिल्हानिहाय तालुके व कंसात गावे
गडचिरोली - 12 (238), उस्मानाबाद - 4 (78), नंदुरबार- 6 (177), वाशीम- 6 (108), वर्धा- 3 (41), भंडारा- 6 (25), सातारा- 3 (47), चंद्रपूर- 9 (50), सिंधुदुर्ग- 4 (80), नांदेड- 4 (60), जळगाव- 1 (26), लातूर- 1 (33), हिंगोली- 5 (131), पालघर- 4 (135), गोंदिया- 1 (47), पुणे - 1 (25) व नगर- 1 (35).
|