जोरदार पावसाने सांगलीची दैना

सांगली - शामरावनगरात पाणी साचून परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले.
सांगली - शामरावनगरात पाणी साचून परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले.

सांगली - परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळी झोडपल्यानंतर रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. सांगली शहर परिसरासह उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका शामरावनगर परिसराला बसला. काल सायंकाळीच पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर रात्रीच्या पावसानंतर शेकडो घरांना पाण्याचा विळखा आहे. परिसरातील सर्व गल्ल्या पाण्याखाली गेल्या आहेत.

मंगळवारी रात्री परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बुधवारी दिवसभर उकाडा होता. सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत शहरात सर्वत्र पाणी साचले. बसस्थानक परिसर, मारुती चौक, स्टेशन रस्ता, सिव्हिल चौक आदी ठिकाणी गुडघाभर पाणी झाले. शामरावनगर येथे पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसल्यामुळे घराभोवती पाण्याचा विळखा पडला. सर्वच गल्ल्यांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत घरातील पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहावी लागली. परंतु रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे दैना उडाली. आज दिवसभर अनेक घरांना पाण्याचा वेढा होता. सर्वच गल्ल्यांमधील रस्ते पाण्याखाली होते. कोणाच्या अंगणात तर कोणाच्या घरात पाणी असे भयानक चित्र होते. घरासमोर लावलेल्या गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन त्या बंद पडल्या. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना आज कामासाठी घराबाहेर पडावे लागले. पाण्यामुळे रस्ताच गायब झाला असून नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

शामरावनगरमधील भयानक परिस्थिती असली तरी अनेक उपनगरातही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. गुंठेवारी भागात अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. तेथे डबकी आणि दलदलीचे चित्र आहे. शहरातील रिकाम्या प्लॉटकडे महापालिकेचे लक्ष नसल्यामुळे तेथे तळी निर्माण झाली आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियम, डॉ. आंबेडकर स्टेडियमसह शाळांच्या क्रीडांगणावर पाणी साचले आहे. रस्त्यांभोवती डबकी निर्माण झाल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. तर सिव्हिल चौकासह अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. 

सर्वेक्षण व उपाययोजना करा
महापालिका क्षेत्रात वर्षभरात रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी २४ कोटी आणि विशेष सहाय्यता निधीतून ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. मोठा निधी खर्च करूनही रस्ते खराब होत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पाणी निचरा करणारी यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकामचे आणि महापालिकेचे रस्ते सुरक्षित राहण्यासाठी पावसाळा संपण्यापूर्वी पाणी तुंबणारे रस्ते आणि चौकांचे सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साखळकर, महेश खराडे, महेश पाटील आदींनी आयुक्तांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com