महामार्गावर अतिक्रमणांचे पुन्हा डोके वर!

महामार्गावर अतिक्रमणांचे पुन्हा डोके वर!

कऱ्हाड परिसरात कोंडी, अपघातांत वाढ; देखभाल-दुरुस्ती विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

कऱ्हाड - महामार्गालगतची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम देखभाल-दुरुस्ती विभाग राबवते. मात्र, ती मोहीम थंडावली की, महामार्गावरील ती अतिक्रमणे पुन्हा डोके वर काढताना दिसतात. मध्यंतरी तासवडे टोल नाका, मलकापूरसह नांदलापूर व पाचवड फाट्यापर्यंत शंभरावर अतिक्रमणांवर हातोडा चालवत कडक कारवाई केली. मात्र, पुन्हा भागात अतिक्रमणे आकार घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी तात्पुरती अतिक्रमणे केली जात आहेत. टेबल टाकून पुन्हा तेच व्यवसाय आकार घेताना दिसत आहेत. त्यामुळे देखभाल विभाग व शासनाने कितीही प्रयत्न केले तरी त्या अतिक्रमणांचा प्रश्‍न सुटत नाही, असेच दिसते. 

वर्षभरापासून महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी देखभाल विभागाने किमान तीन ते चार वेळा मोहीम राबवली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसते. महामार्गालगत किरकोळ व्यवसाय नेहमीच वाढत आहेत. त्यातून चांगली कमाई होत असल्याने त्यांचा व्यवसाय करण्याकडे कल दिसतो आहे. मात्र, त्याच व्यावसायिकांनी हळूहळू सेवा रस्त्यांसह महामार्गालगत डेरा टाकल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून अतिक्रमणे आहेत. कितीही वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली तरी काही गोष्टी मॅनेज केल्या की, पुन्हा ती अतिक्रमणे वाढताना दिसत आहेत. परिणामी महामार्गावर त्याची कोंडी होत होती. चहाची टपरी किंवा वडापावचा गाडा दिसला की, तेथे थांबणाऱ्या वाहनांची संख्या वाढत होती. त्याचा परिणाम महामार्गावर कोंडी होताना दिसतो. त्यामुळेही अनेकदा अपघात झाल्याच्या घटना पोलिसांकडे नोंद आहेत. तासवडे टोल नाक्‍यावर आधीच वाहनांची गर्दी असते. त्यात हातगाड्यांवर पुढे तीच वाहने थांबत होती. त्यामुळे मोठी कोंडी होऊन अर्धा महामार्गच ती वाहने व्यापून टाकत होती. त्यामुळे तेथील ३४ अतिक्रमणे मध्यंतरी हटवण्यात आली. मात्र, पुन्हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये तेथे ती अतिक्रमणे आकार घेत आहेत. काही दिवसांत तेथे टेबल टाकून साहित्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

व्यावसायिक तेथे ती दुकाने थाटताना सायंकाळनंतर वेळ गाठत आहेत. त्यामुळे मोहीम राबवण्यास अडचण येताना दिसते. 

येथील कोल्हापूर नाक्‍यापासून पुढे मलकापूर, नांदलापूर ते पाचवड फाट्यापर्यंत अशीच अवस्था आहे. महामार्गालगतच्या सेवा रस्त्यालगतची सुमारे पन्नासहून अधिक अतिक्रमणे मध्यंतरी काढली. मात्र, लगेचच काही ठिकाणी पुन्हा तशीच दुकाने थाटली गेली. एखादा टेबल घेवून काहीतरी विक्री करण्यात येत होती. थंड पेयांसह रसाची दुकाने मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या कडेला सध्या दिसत आहेत. देखभाल विभागाच्याही कारवाईच्या मर्यादा स्पष्ट असल्याने त्यांना हटवण्याचे आव्हान आहे.

...अशी आहे स्थिती 
 अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यासाठी कडक कारवाईची गरज 
 वर्षभरापासून तीन ते चार वेळा मोहीम राबवूनही उपयोग नसल्याचे स्पष्ट 
 व्यावसायिकांनी सेवा रस्त्यांसह महामार्गालगत डेरा टाकल्याने अडचण 
 थंड पेयांसह रसांची दुकाने मोठ्या प्रमाणात वाढली प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्‍यकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com