देशातील जनतेसाठी मरण आल्यास माझे भाग्यच - अण्णा हजारे

aana-Hazare
aana-Hazare

राळेगणसिद्धी - हार्टअटॅक येऊन मरण्यापेक्षा समाज व देशासाठी मरण आले, तर ते माझे भाग्यच असेल. आता करेंगे या मरेंगे, अशाच स्वरुपाची ही लढाई आहे. देशातील जनता आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी शरिरात प्राण असेपर्यंत माझा लढा आता थांबणार नाही, अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. 

लोकायुक्त, लोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी आज सकाळी अकरा वाजता यादवबाबा मंदिरासमोर उपोषण आरंभले. त्यावेळी उपस्थितांसमोर भावना मांडताना ते बोलत होते. अण्णांची भूमिका ऐकून ग्रामस्थ व उपस्थितांना गहिवरुन आले. अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. 

अण्णा म्हणाले, "देशातील कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो. त्याचे सरकारला काहीच वाटत नाही, याचा खेद वाटतो. देशातील उद्योगपतींची ज्यावळी काळजी सरकारला वाटते, तेवढी शेतकऱ्यांची का वाटत नाही, असा प्रश्‍न पडतो. शेतकऱ्यांची हाक सरकारला ऐकूच येत नाही. सरकार मतलबी बहिरे झाले आहे, असे वाटते. शेतकऱ्यांचे हाल दिसत असूनही सरकार आंधळ्याची भूमिका का घेते, तेच समजत नाही.'' 

देशातील राजकीय स्थितीबाबतही अण्णांची स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "देशात लोकतंत्र नसून, फक्त गोरे गेले व काळे आले, अशी अवस्था आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा, अशी सरकारची इच्छाच असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच लोकपाल कायदा लागू करण्यात सरकार चालढकल करत आहे. 

स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. त्याचाही त्यांना विसर पडला, हे देशातील जनतेचे दुर्भाग्य आहे का? लोकपाल कायदा झाल्यानंतर राज्यात लोकायुक्त कायदा एक वर्षाच्या आत करावा, अशी तरतूद आहे. राज्य सरकारला चार वर्षे होऊन गेली तरी अद्याप कायदा करता आलेला नाही. सरकारने उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यास काय हरकत होती. 

दुष्काळीस्थिती आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी गाळात रुतला आहे. त्याला त्यामधून बाहेर काढण्यासाठी एक वेळेस संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. त्यानंतर शेतकरी पुन्हा दारात उभा राहणार नाही. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन देणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी शरिरात प्राण असेल तोपर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचेही आण्णा म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com