सोलापूर - सार्वजनिक रस्ते, पदपथ व धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरील अनधिकृत व रहदारीला अडथळे ठरणारी प्रवेशद्धारे आणि कमानी तातडीने पाडण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात मुंबई व औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल झालेल्या जनहित याचिकेवर दिलेल्या निकालानुसार हे आदेश देण्यात आले आहेत.
नागरी क्षेत्रात सार्वजनिक जागा, रस्ते, महामार्ग, पदपथ या ठिकाणी कमानी, स्तंभ, प्रवेशद्वारे आदींची उभारणी करताना सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणांची मान्यता घ्यावी लागणार आहे. संबंधित यंत्रणांनीही अशा कामांना परवानगी देताना रहदारीला अडथळे येणार नाहीत; तसेच जीविताला हानी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असणार आहे.
ज्या संस्थांनी सार्वजनिक रस्त्यावर प्रवेशद्वार किंवा कमानी बांधल्या आहेत, त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधितांची असणार आहे. ज्यांनी सध्या अनधिकृतपणे तसेच रस्त्याला अडथळा होईल अशा कमानी उभारल्या आहेत, त्यांनी संबंधित यंत्रणेची परवानगी घ्यावी. परवानगीची कागदपत्रे सादर न करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांच्या वा कोणीही दावा न केलेल्या अनधिकृत कमानी व प्रवेशद्वारे एक महिन्यात पाडण्यात येणार आहेत.
|