शिवरायांच्या इतिहासाचे प्रवाह चुकीचेच - सबनीस 

शिवरायांच्या इतिहासाचे प्रवाह चुकीचेच - सबनीस 

सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास आणि त्याला उत्तर देण्यासाठी जातीयवाद्यांनी लिहिलेला इतिहास हे दोन्हीही इतिहासाचे प्रवाह चुकलेले आहेत. त्यातून शिवरायांच्या इतिहासाचा विनयभंग झालेला दिसतो. काही विचारवंतांचा तिसरा मध्यवर्ती प्रवाह तटस्थ आहे. ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर वादात महाराष्ट्र होरपळत आहे. त्यातून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ व सत्यनिष्ठ इतिहास तिसऱ्या विवेकी भूमिकेतून मांडण्यासाठी मी कंबर कसली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज दिली. 

येथे जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री. सबनीस म्हणाले, ""छत्रपती शिवराजांचा खरा इतिहास मला दिसत नाही. सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवणारा महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या गवताला काडीला जपणारा महाराष्ट्र, सर्व आठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्य स्थापणारा शिवरायांचा महाराष्ट्र आज दुभंगला आहे. ब्राह्मण, बहुजन, विद्वानांच्या लेखनामुळे समाजात फूट पाडली. महाराजांची वाटणी झाली. शिवरायांचा, संभाजीराजेंचा इतिहात जसा वाचला, तसा प्रत्यक्षात आता दिसत नाही.'' 

इतिहास विकृत बनत आहे. शिवाजी महाराजांची आठ लग्न झाली, शिवाजी महाराजांचा तांत्रिक राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांचा अस्पृश्‍य महिलेशी विवाह झाला होता, नवव्या बायकोचा कडेलोट करून तिला मारले गेले, शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडला होता? अशी विकृत विधाने ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर वादात विद्वांनानी पेरली आणि त्याला इतिहास म्हणण्याची दुर्दैवी वेळ महाराष्ट्रावर आली आहे, असे नमूद करून श्री. सबनीस यांनी सरकार काय करत आहेत, असा प्रश्‍नही उपस्थित केला. 

महात्मा गांधींना नथुराम गोडसेंनी गोळ्या घातल्या आणि ब्राह्मण जात बदनाम केली. अशा नथुराम गोडसेंचे मंदिर बांधण्याची चळवळ मूठभर लोक करत आहेत. गांधीतील "महात्मा' मारणारा नथुराम देशद्रोही नसेल, तुम्ही त्याला देशभक्‍त ठरवून मंदिरातील देवाच्या ठिकाणी स्थापना करणार असाल, तर गांधीमधील "महात्म्या'चे मूल्यमापन कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. 

...तर "यूएसआय' होईल - उदयनराजे 
जातीपातींच्या संकुचित विचारांमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. हे असेच चालत राहिले तर प्रत्येक राज्याचे स्वतंत्र कायदे असणाऱ्या अमेरिकेप्रमाणे आपल्या देशाला "युनायटेड स्टेट ऑफ इंडिया' म्हणावे लागले. तसे होऊ नये, यासाठी पहिल्यांदा जात-पातीचे राजकारण बाजूला केले पाहिजे, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमात केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com