सांगली - संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय समिती बोलावण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी पत्रव्यवहार झाला आहे. माणुसकीला कलंकित करणाऱ्या या प्रकरणात अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसतो. कितीही मोठा अधिकारी असू दे, त्याची चौकशी होईल, असे खासदार संजय पाटील यांनी आज येथे पत्रकार बैठकीत सांगितले.
खासदार पाटील यांनी आज म्हैसाळ येथे भेट देऊन भ्रूणहत्याकांड प्रकरणाची माहिती घेतली. भारती हॉस्पिटललाही त्यांनी भेट दिली.
स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत भाजपचे नेते दीपक शिंदे होते. त्यानंतर सांगलीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'म्हैसाळची घटना माणुसकीला कलंकित करणारी आहे. यामुळे जिल्ह्याचे नाव बदनाम झाले. या घटनेची सखोल चौकशी व्हावी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. कर्नाटक सीमेवरील गाव असल्याने कर्नाटकात तपासणी, चौकशी करावी लागणार आहे. त्यात अडथळे येऊ नयेत यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी पत्रव्यवहार झाला आहे. या प्रकरणाची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची विनंती त्यांना केली आहे.''
कायद्यात दुरुस्तीसाठी प्रयत्न
ते म्हणाले, 'म्हैसाळच्या या घटनेतील चौकशीत अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसतो. याला जे जबाबदार आहेत, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्या सर्वांची चौकशी होईल. आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एमपीटी, पीसीपीएनडीटी या कायद्यांमध्ये काही त्रुटी असतील तर त्यावर लोकसभेत आवाज उठवू. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करण्यास प्रयत्न करू.''
स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास
या प्रकरणात तपास करणारी समिती स्थानिक आहे. तिच्यावर ग्रामस्थांचा विश्वास नाही. यात अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, खासदार पाटील म्हणाले, ""हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करू.''
|