इस्लामपूर (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी) - नालायक राज्यकर्त्यांनी लोकशाहीची विटंबना चालवली आहे. संविधनात्मक लोकशाही धोक्यात आहे. जाती-विषमतेचे विष बंधुतेला घातक आहे. बंधुतेच्या विचारानेच भारत तत्त्वज्ञानात्मक महासत्ता बनेल, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद (पुणे) आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजतर्फे आयोजित 19 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचा समारोप व पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अश्विनी धोंगडे यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोघांनीही पुरस्कार रक्कम बंधुता संस्थेसाठी परत दिली. हडपसर येथील कर्मवीर पतसंस्थेला स्वामी विवेकानंद पुरस्कार देण्यात आला. संमेलनाध्यक्ष उद्धव कानडे, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील, प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष महेंद्र भारती, शहाजी पाटील, एन. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सबनीस म्हणाले, ""एनडी सर गांधी आणि मार्क्सचे अस्सल अनुयायी आहेत. देशात सर्वत्र अत्याचार, अन्याय सुरू आहे. डाव्या- उजव्या, उजव्या- उजव्या आणि डाव्या- डाव्यांमधल्या संवादाची गरज आहे. महापुरुष पराभूत झालेत का? हा प्रश्न पडावा, असे दिवस आहेत. बंधुतेचा विचार जीवन सुंदर बनवेल. माणसामाणसांत बंधुभाव पेरला पाहिजे. गुन्हेगार लोकप्रतिनिधी निवडून देणारे आपण किती लायक आहोत? राजकारणी मुर्दाड आहेत; पण आपली संवेदना शिल्लक आहे का? हे संमेलन लोकशाहीवादी आहे.''
डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ""धर्म, जाती माणसाने, हितसंबंधी लोकांनी निर्मिल्या. संतांनाही न्याय देता आला नाही. जातीपातीचा प्रश्न प्रबोधनाचा राहिलाच नाही. हक्क मिळत नाहीत, हिसकावून घ्यावे लागतील. धर्म, जात घराच्या आत ठेवा. धर्माच्या नावाने चिंध्या केल्या जात आहेत. जात-धर्माभिमान सोडल्याशिवाय आपण माणूस होणार नाही.''
|