इचलकरंजीच्या पाणी प्रश्‍नाने कोंडी

इचलकरंजीच्या पाणी प्रश्‍नाने कोंडी

जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. इचलकरंजी शहराला वारणा नदीचे पाणी देण्यावरून राजकीय पटलावरची हवा चांगलीच गरम झाली आहे. राज्यकर्त्यांसाठी हा विषय म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ या म्हणीप्रमाणे अडचणीचा ठरत आहे.

त्यातही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासमोर या पाणी प्रश्‍नाने धर्मसंकट उभे राहिले आहे. वारणा पाणी योजनेवरून इचलकरंजीची बाजू घ्यायची झाली तर ग्रामीण जनता विरोधात आणि ग्रामीण भागाची बाजू घ्यायला गेल्यास शहर विरोधात, अशा दुहेरी कात्रीत उमेदवार सापडले आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वांत मोठे शहर म्हणून इचलकरंजी शहराकडे पाहिले जाते. राज्याचे मॅंचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला उद्योगांची परंपरा आहे. सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचे हे शहर आहे. शहराला सध्या कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र या योजनेची कार्यक्षमता, गळती आदीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. कोल्हापूर शहर व नदीकाठच्या गावांसह इचलकरंजी शहराचे दूषित पाणीही पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी वारणा नदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. शिरोळ तालुक्‍यातील दानोळी गावातून इचलकरंजीसाठी पाणी आणण्याची योजना आखली; मात्र नदीकाठच्या गावांनी त्यास जोरदार विरोध दर्शविला.
शासनाने ही योजना करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला; पण त्याला दानोळीसह शिरोळ, हातकणंगले, वाळवा, शिराळा तालुक्‍यांतील वारणा नदीकाठच्या गावांनी विरोध केला. नदीकाठावर १०० पेक्षाही अधिक गावे आहेत.

परिणामी वारणेवरून पाणी नेण्याचा प्रश्‍न अधिकच संवेदनशील बनला. गावोगावी बंद, मोर्चे व निवेदनांचा पाऊस पडल्याने या प्रश्‍नाने गंभीर वळण घेतले. ही योजना करण्यासाठी प्रशासकीय बळाचा वापर झाला; पण गावागावात आंदोलनाची धार वाढल्यानंतर शांततेने प्रश्‍न सोडवण्याचा मुद्दा पुढे आला. वारणेवरून योजना करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर व इतर लोकप्रतिनिधी आग्रही राहिले आहेत. तर बळजबरीने ही योजना होऊ नये, असे सांगत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. तर धैर्यशील माने यांनी हा पाणी प्रश्‍न पेटण्यास राजू शेट्टीच जबाबदार असल्याचा आरोप केला. 

आजमितीस शासनाने दानोळी येथूनच इचलकरंजीला पाणी नेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. नदीकाठावर सध्या तरी वादळापूर्वीची शांतता दिसत आहे. या वादाला आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकच खतपाणी घातले जाण्याची चिन्हे दिसू लागली असून, याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्‍यताही व्यक्‍त केली जात आहे.

गाव विरुद्ध शहर वाद 
खासदार शेट्टी यांनी ग्रामस्थांची बाजू घेतल्याने इचलकरंजी शहरात नाराजीचा सूर आहे. तर भाजपने इचलकरंजीकरांच्या बाजूने कौल दिल्याने ग्रामीण भागात व विशेषत: नदीकाठच्या गावांत नाराजी आहे. धैर्यशील माने यांनी यात कोणतीही स्पष्ट भूमिका न घेता थेट शेट्टींवर आरोप करत या वादापासून दोन हात दूर राहणे पसंत केल्याचे चित्र आहे. एकूणच, इचलकरंजीच्या पाणी प्रश्‍नावरून गाव विरुद्ध शहर, असा वाद निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com