उत्पादकांसाठी यंदा वाढला गुळाचा गोडवा

उत्पादकांसाठी यंदा वाढला गुळाचा गोडवा

कोल्हापूर - गेल्या पाच वर्षांत प्रथमच गुळाला विक्रमी दर मिळू लागला आहे. सौद्याच्या मुहूर्तावेळी जाहीर झालेल्या दरापेक्षा यंदा जादा दर मिळाल्याने गूळ उत्पादकांची चांदी झाली आहे. गुळाची आवक कमी होऊ लागल्याने पुढील काही दिवसांत दराचा नवा विक्रम नोंद होण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या पाच वर्षांत गुळाच्या दरात घसरणच होत असल्याचे चित्र होते. सरासरी १ हजार ८०० रुपये पर्यंतच दर मिळाला. यंदा पाच, दहा किलोच्या लहान रव्यांना सरासरी ३ हजार ९०० रुपये इतका दर मिळाला. जास्तीत जास्त ४ हजार ४०० ते ४ हजार ८५० पर्यंतही दर मिळाला आहे. 

शासनाने गूळ नियमनमुक्त केल्यानंतर गुळाचे दर कमालीचे घसरले. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियमन सुरू झाल्याने यंदा मात्र शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. 

दरवर्षी पाडव्याला गुळाचा पहिला सौदा मुहूर्तावर केला जातो. प्रत्येक वर्षी मुहूर्ताच्या सौद्याला अधिकाधिक दर जाहीर केला जात असे. 

प्रत्यक्षात नंतर तेवढा दर कधीच मिळत नसे. यावेळी मात्र, मुहूर्तालाच वास्तव दर देण्याचा निर्णय घेऊन तशी घोषणा झाली. ४ हजार ५०० रुपयाने मुहूर्ताचा सौदा झाला. सध्या हाच दर ४ हजार ९०० च्या आसपास आहे. 

बाजार समितीत दरवर्षी सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल होते. ३० ते ३५ लाख गूळ रव्यांची आवक होते. त्यापैकी ८० टक्के गूळ गुजरातला व उर्वरित १० टक्के स्थानिक बाजारपेठेत, १० टक्के कोकण, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात जातो. 

जिल्ह्यात ९५० गुऱ्हाळघरे असून, त्यापैकी यंदा केवळ ४५० गुऱ्हाळघरे सुरू झाली. सध्या २५० गुऱ्हाळघरेच सुरू आहेत. विविध कारणांनी गुऱ्हाळघर चालवणे अवघड होत आहे.  

यावर्षी कमी झालेले उसाचे प्रमाण, सरासरी उताऱ्यात झालेली घट आणि घटती गुऱ्हाळघरांची संख्या यामुळे एकूणच गूळ उत्पादन घटले. मागणीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने गुळाला चांगला दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सरासरीच्या दुप्पट दर मिळत आहे.  

यावर्षी १५ ऑक्‍टोबरपासून आजपर्यंत सुमारे १२ लाख ५ हजार रव्यांची आवक झाली. आतापर्यंत १९० कोटींची उलाढाल झाली आहे. एक किलो गुळाच्या बॉक्‍सला ३९०० ते ५०७५ रुपये दर मिळत आहे. १९० गुऱ्हाळघरे सध्या सुरू आहेत. दर चांगला मिळाल्याने समाधान आहे.
- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती

यंदा उसाचे उत्पादन कमी झाले, उताराही कमी आहे. त्यामुळे गुऱ्हाळघरांकडे येणारा ऊस कमी झाला. परिणामी, अनेक गुऱ्हाळघरे बंद राहिली. गुळाचे उत्पादन घटल्यामुळे जादा दर मिळू लागला आहे.
- भगवानराव काटे, गूळ उत्पादक शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com