पंचाची साक्ष; खटल्यात एकशे साठ साक्षीदार तपासणार
नगर - जवखेडे (ता. पाथर्डी) येथील तिहेरी खूनखटल्याच्या सुनावणीस आज प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुरवात झाली. पंच आत्माराम घाटूळ यांची आज सरतपासणी व उलटतपासणी पूर्ण झाली. या वेळी त्यांनी मृत संजय जगन्नाथ जाधव यांच्या अंगावरील कपडे ओळखले. तसेच मृताच्या अंगावरील जखमाही सांगितल्या.
जवखेडे येथे 20 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री संजय जाधव, सुनील संजय जाधव व जयश्री संजय जाधव यांची शेतातील वस्तीवर निर्घृण हत्या झाली होती. हा प्रकार 21 ऑक्टोबरला समोर आला. याबाबत पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासानंतर फिर्यादी प्रशांत दिलीप जाधव याला पोलिसांनी अटक केली. नंतर अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव यांनाही अटक केली. गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीशासमोर आज या खटल्याच्या सुनावणीस सुरवात झाली. त्यात 160 साक्षीदार तपासले जाणार आहेत. पंच आत्माराम घाटूळ यांची राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उमेशचंद्र यादव यांनी सरतपासणी घेतली. ते म्हणाले, ""घटना उघड झाली, त्याच दिवशी मी तेथे पोचलो. संजय व जयश्री यांचे मृतदेह माझ्यासमोरच विहिरीतून काढले. डोके व पाय नसलेले धड बाहेर काढल्यानंतर आरोपी प्रशांत जाधव याने हा मृतदेह सुनीलचा असल्याचे सांगितले.'' घाटुळे यांनी संजयच्या अंगावरील कपडेही ओळखले. तसेच त्याच्या अंगावरील जखमाही सांगितल्या.
विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून तपास
जवखेडे तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजले होते. आरोपींच्या अटकेसाठी राज्यभर मोर्चे निघाले. फिर्यादीच आरोपी निघाल्याने हे प्रकरण शांत झाले. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी घटनास्थळी ठाण मांडून खुनाचा तपास केला. आरोपींच्या मनोवैज्ञानिक चाचण्या घेतल्या. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनतर आज खटल्याच्या कामास सुरवात झाली.
|