वाठार स्टेशन - परिसर कायम दुष्काळी असल्याने या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या येथील लोकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र, जाधववाडी येथील जोगमठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावातील गाळ तनिष्का व्यासपीठाच्या साहाय्याने व सकाळ रिलीफ फंडातून काढल्यामुळे डिसेंबर महिन्यात कोरड्या पडणाऱ्या तलावात आजही पाणी असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
जाधववाडी, विखळे, फडतरवाडी, दाणेवाडी ही गावे कोरेगाव तालुक्याच्या ईशान्य बाजूस आहेत. या गावांना पूर्व, दक्षिण व उत्तर अशा तीनही बाजूने डोंगर आहेत. याठिकाणी कोणताही पाण्याचा स्त्रोत नाही. पावसाच्या पाण्यावर येथील शेतकरी आपली शेती कशीबशी करतो आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने सध्या येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या शिवारात ज्वारीच्या पिकाला पाणी नसल्याने ज्वारीची कणसे भरलेली नाहीत तद्वत या भागात धान्याचा तुटवडा भासणार आहे. या परिसरातील सर्व तलाव कोरडे पडले आहेत.
मात्र, दोन वर्षांपूर्वी येथील तनिष्का व्यासपीठ व सकाळ रिलीफ फंडातून जोगमठ डोंगर पायथ्याशी असलेल्या तलावातील गाळ काढण्यात आला होता. हे काम येथील लोकांना एकढे फायदेशीर झाली, की आज ही केवळ या एकमेव तलावात थोडा पाणीसाठा उपलब्ध असलेला दिसतो आहे. त्यामुळे तलावाखाली असलेल्या जाधववाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस अजून १५ दिवस मुबलक पाणी राहणार आहे.
जलसंधारणाला प्रोत्साहन!
तनिष्का व्यासपीठ व सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून तलावातील गाळ काढल्याने तलावात पाणी अद्याप दिसत असल्याने हा तलाव येथील लोकांना जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहनच देत आहे. परिसरामध्ये जलसंधारणाची कामे झाल्यास ही गावे कायम दुष्काळमुक्त होतील, अशी येथील लोकांना खात्री झाली आहे. यावर्षी ही गावे मोठ्या ताकदीने जलसंधारणाच्या कामात उतरली आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.