‘कृष्णा- कोयना’च्या पाण्याची बदलली चव!

कऱ्हाड - कृष्णा नदीचे पाणी अडविल्याने प्रवाहच थांबून डबक्‍यासारखी स्थिती झाली आहे.
कऱ्हाड - कृष्णा नदीचे पाणी अडविल्याने प्रवाहच थांबून डबक्‍यासारखी स्थिती झाली आहे.

कऱ्हाड - संत वाहते कृष्णामाई हे वाक्‍य आता कागदावरच राहिले आहे. टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे पाण्याचे वहन थांबले आहे. तीच स्थिती कृष्णा नदीला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या कोयना नदीचीही झाली आहे. परिणामी पाणी अनेक दिवस साचून त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. पिण्यासाठी येणाऱ्या पाण्याचीही दोन दिवसांपासून चव बदलली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यास धोका निर्माणची भीती वाटत आहे. 

दुष्काळी कडेगाव, आटपाडी तालुक्‍यांतील गावांना पाणी मिळावे, या हेतूने सरकारने कऱ्हाडजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी टेंभू गावच्या पात्रात अडवले आहे. तेथून पाणी उचलण्यासाठी पाण्याची आवश्‍यक पातळी ठेवावी लागते. ती ठेवण्यासाठी नदीचे वाहते पाणी अडवण्यात येते. अनेक दिवस पाणी अडवण्यात येत असल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्याचे वहन थांबते.

परिणामी पाण्यामध्ये जलचर वाढून शेवाळ्याची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येऊन ते वापरास अयोग्य होत आहे. त्याबरोबर नदीच्या पाण्यात अनेक गावांचे सांडपाणी मिसळते. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यामध्ये वाढच होत आहे. पालिकेकडून नदीचेच पाणी शुद्धीकरण करून पिण्यास दिले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्याही पाण्याची चव बदलली आहे. शेवाळ्यासारखा वास पाण्याला येऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. टेंभू प्रशासन आणि पालिकेने याची दक्षता घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पोहणाऱ्यांची गैरसोय 
कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर दररोज शकडो आबालवृद्ध पोहण्यासाठी येतात. मात्र टेंभू योजनेसाठी पाणी अडविल्याने पोहणाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्यामुळे त्यांना त्यामध्येच अंघोळ करावी लागत आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढल्याने पोहणाऱ्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्यानेही एखादा जिवानीशी जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

चार दिवसांपासून पाण्याची चव बदलली आहे. पाणी खराब लागत आहे. पाणी साठविल्याचा तो परिणाम आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. लहान मुलेही आजारी पडत आहेत. त्याचा विचार करून तातडीने उपाययोजना करावी.
- राहुल पोळ, नागरिक, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com