पाटण - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी आठ वाजता पायथा वीजगृहातून दोन हजार 100 क्युसेक, तर दुपारी चारच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडून पाच हजार 788 क्युसेक असे एकूण सात हजार 888 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले. एक ऑगस्ट रोजी आवश्यक असणारी निर्धारित पाणीपातळी यंदा आधीच गाठल्याने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
कोयना जलाशयात आज एकूण पाणीसाठा 77.63 टीएमसी झाला असताना दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, सकाळी आठ वाजता पायथा वीज गृहातूनही पाणी सोडण्यास सुरवात केली होती. गेल्या वर्षी 29 जुलैला पायथा वीजगृहातून, तर 30 जुलैला दरवाजांतून पाणी सोडण्यात आले होते. या वर्षी मात्र लवकर पाणी सोडावे लागले. पाच जूनपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला.
धरणातून सोडलेले पाणी कऱ्हाडला 12 तासांत, तर सांगलीला 28 तासांच्या दरम्यान पोचते. पाणी सोडल्याने कोयना नदीची व कऱ्हाडपासून कृष्णा नदीची पाणीपातळी वाढणार आहे.
पावसामुळे कोयना धरणात 78 हजार 485 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सायंकाळी पाच वाजता जलाशयाची पाणीपातळी 2138.10 फूट, तर पाणीसाठा 77.92 टीएमसी होता.
गेल्या 24 तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोयनानगर 179
नवजाला 233
महाबळेश्वर 198
|