दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी मोकाट; जबाव दो आंदोलन

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी मोकाट; जबाव दो आंदोलन

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या (रविवार) चार वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही शासन, सीबीआय, पोलिस प्रशासन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडू शकलेले नाहीत.तसेच पानसरे व कलबुर्गी यांचे मारेकरीही मोकाट आहेत. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर "जबाव दो' आंदोलन करत शासनाच्या दिंरगाईचा निषेध केला. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्टला खून झाला. तसेच ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्ष पूर्ण झाली. यातच प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचीही हत्या झाली. मात्र, शासन, पोलिस प्रशासन व सीबीआयला फरारी मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात यश आलेले नाही. शासन यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे. तपासाच्या संथ गतीमुळे आरोपींना बळ मिळत आहे. दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांना न्याय मिळावा यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने वेळोवेळी आंदोलन केली आहेत, मात्र शासनाला याचा विसर पडला आहे. गोंविद पानसरे यांच्या खुनातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला जामीन मिळाला आहे. तो फरार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने न्यायालयामध्ये या जामिनाविरोधात अर्ज दाखल करावा, तसेच सनातन संस्थेचे साधक व खुनातील संशयित आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार आणि त्याच्या साथीदारांना अटक होत नाही, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. सीबीआयने यातील दोन संशयित मारेकऱ्यांवर प्रत्येकी पाच लाखांची बक्षिसे जाहीर केलेली आहेत. तर पानसरे यांच्या खुनातील आरोपींना पकडून देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र त्यांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त केली जात नाही, हे दुर्दैवी आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या स्वयंसेवकांनी शासनाविरुद्ध घोषणा दिल्या. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माधव बावगे, सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार यांनी राज्यभर अशी निवेदने दिली आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, मेधा पानसरे, सीमा पाटील उपस्थित होते.


लागेल ती मदत करू: सतेज पाटील
गोंविद पानसरे, नरेंद्र दाभोलकर व प्रा. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांबाबत सरकाराला गांभीर्य नाही. मारेकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी आंदोलकांना लागेल ती मदत करण्यास कॉंग्रेस पक्ष तयार आहे. उद्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापुरात येत आहेत. त्यांनाही सरकारच्या कचखाऊ धोरणाबाबत माहिती दिली जाईल, असे आमदार सतेज पाटील यांनी या वेळी आंदोलकांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com