एसटीच्‍या कोल्हापूर विभागाला वाली कोण?

एसटीच्‍या कोल्हापूर विभागाला वाली कोण?

कोल्हापूर - राज्यात सर्वाधिक प्रवासी महसूल देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एसटी महामंडळाला चार महिने कोणी वालीच नाही, अशी स्थिती आहे. विभाग नियंत्रक नवनीत भानप हे अपवाद वगळता साडेतीन महिने रजेवर होते. ते सेवानिवृत्त झाले. त्याला महिना होत आला. तरीही नवीन विभाग नियंत्रक येथे आलेले नाहीत. यात विभागीय वाहतूक अधिकारीही नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाची सेवा रामभरोसे सुरू आहे. अशात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच आमदारांच्या पाठपुराव्यालाही एसटीच्या मुंबईतील उच्चाधिकाऱ्यांनी दाद दिली नसल्याचे दिसते. 

एसटी महामंडळाअंतर्गत जिल्ह्यात ११ एसटी आगार आहेत. प्रत्येक तालुक्‍यात व मोठ्या गावात २६ हून अधिक बसस्थानके आहेत. शहरात मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर तसेच रंकाळावेस अशी तीन महत्त्वाची बसस्थानके आहेत. रोज सहाशेवर बसगाड्यांतून दीड ते दोन लाख प्रवासी प्रवास करतात. जवळपास पाऊण ते एक कोटीचा महसूल जिल्ह्यातून एसटी महामंडळाला मिळतो. अशा महत्त्वपूर्ण जिल्ह्याला विभाग नियंत्रक नाही, ही खेदाची बाब आहे.

चार महिन्यांपूर्वी शहरात एसटीच्या शटल सेवेच्या बसचा अपघात झाला. यात तीन ठार, आठ जखमी झाले. अपघातानंतर सर्वच पातळ्यांवर महामंडळावर टीका झाली आणि विभाग नियंत्रक रजेवर गेले. ते पुन्हा दोन दिवसांचा अपवाद वगळता पुन्हा सेवेसाठी आलेच नाहीत. तत्पूर्वी त्याच विभाग नियंत्रकांवर नोटाबदली प्रकरणी एका संघटनेने काही आरोप केले.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी ते व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत तक्रारी गेल्या. त्या प्रकरणी विभाग नियंत्रकांची चौकशी सुरू झाली. याच काळात विभाग नियंत्रक सेवानिवृत्त झाले.त्यानंतर या पदावर कोणी आले नाही.प्रभारीपद ज्यांच्याकडे दिले, ते तंत्र शाखेचे आहेत. त्यामुळे त्यांना वाहतूक नियोजन करणे मुश्‍कील होते.

यातून अनेक प्रश्‍न निर्माण  झाले आहेत. दरम्यान, पंढरपूर यात्रा, अंगारकी संकष्टी, दिवाळी सुट्टी असा प्रवाशांत वाढ असलेला प्रवासी हंगाम झाला. नव्याने पुणे मार्गावर शिवशाही बससेवा सुरू झाली. राज्यात सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापुरात मिळाला. पुढे शिवशाही गाडी मुंबई सेवा सुरू झाली. अशात सौंदत्ती यात्रा जवळ आली. त्यालाही जवळपास ५० ते ८० हजार भाविक एसटीने सौंदत्तीला जातात. त्यांचा खोळंबा आकाराचा प्रश्‍न दरवर्षीप्रमाणे चर्चेत आहे. अशा असंख्य गैरसोयी असताना विभाग नियंत्रक व वाहतूक अधिकारी ही पदे रिक्त असल्यामुळे कोणत्याच प्रश्‍नाचे मिळत नाही.

पालकमंत्री, आमदारांनी पुन्हा लक्ष द्यावे 
अनेक पक्ष, संघटना निवेदन घेऊन एसटी महामंडळात येतात, तेव्हा विभाग नियंत्रक नाहीत, असे कारण देत कोणीतरी अधिकारी निवेदन स्वीकारतात. त्यांचे पुढे काय झाले, याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे नवा निर्णय होत नाही. जुने निर्णय धड चालवले जात नाहीत. असे प्रकार पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनाही विभाग नियंत्रक नसल्याने होणारी कोंडी माहीत आहे. त्यांनी काही अंशी जरूर पाठपुरावा केला; पण प्रत्यक्ष विभाग नियंत्रक येथे मिळालेले नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे पालकमंत्री व तीन-चार आमदार कोल्हापूरला एक विभाग नियंत्रक आणू शकत नाहीत, याचे आश्‍चर्य प्रवाशांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com