हुपरी नगरपालिकेसाठी पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट

file photo
file photo

हुपरी (जि. कोल्हापूर) : हुपरी नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी आज (गुरुवार) नगराध्यक्ष पदाच्या सात पैकी दोन तर नगरसेवक पदाच्या 112 पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची ताराराणी जिल्हा विकास आघाडी, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडी या प्रमुख पक्ष आघाड्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस वर अस्तित्व हरवण्याची नामुष्की ओढवली आहे.

अपक्ष नंदीनी खाडे यांच्यासह भाजपच्या बंडखोर कल्पना सयाजी पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून भरलेले अर्ज मागे घेतले . प्रभाग क्रमांक एक मधून अवधूत कुईंगडे व संजय मोरबाळे, प्रभाग तीन मधून प्रकाश मुधाळे, प्रभाग पाच मधून सागर खैरे व मीना कांबळे अशा पाच जणांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी जयश्री महावीर गाट ( भाजप), सीमा प्रकाश जाधव (ताराराणी जिल्हा विकास आघाडी), विमल मुरलीधर जाधव ( शिवसेना), गीतांजली दौलतराव पाटील ( मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडी) व दिपाली बाळासाहेब शिंदे ( राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक चुरशीची व रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सर्वच नऊ  प्रभागात बहुरंगी लढती होणार आहेत.

नवनिर्मित हुपरी नगरपालिकेच्या पहिल्या आणि ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकी साठी 13 डिसेंबर ला मतदान होत आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रिये नंतर पुढच्या टप्प्यातील निवडणूकीला प्रारंभ होत असून उद्या शुक्रवारी पक्ष वगळता आघाड्यांना चिन्हे वाटप होणार आहेत . सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचा बहुमान संपादन करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी चढाओढ लागली आहे.

दरम्यान, रेणुका भक्त असलेल्या तातोबा बाबूराव हांडे यांनी ताराराणी आघाडी तर्फे प्रभाग क्रमांक तीन मधून अर्ज भरुन खळबळ उडवून दिली होती. मात्र मतदार यादी व मतदान ओळख पत्रातील भिन्न नावा मुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी हांडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता. त्या विरोधात हांडे यांनी दाखल केलेले अपिल आज झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने फेटाळून लावले . तर चिन्हांचे वाटप होण्या पूर्वीच ताराराणी आघाडी ने 'शिटी' चिन्हाचा वापर व प्रचार पत्रके वाटून जाहीर प्रचार केला. त्यामुळे शिटी चिन्ह गोठवण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष राजाराम देसाई यांनी निवडणूक अधिकाऱ्यां कडे निवेदना द्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com