पाण्याचे अधिकार गावांकडे द्यायला हवेत - पोपटराव पवार

पाण्याचे अधिकार गावांकडे द्यायला हवेत - पोपटराव पवार

गडहिंग्लज - गावापासून युनोपर्यंत पाणी हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यामुळेच नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. त्याच्या केंद्रस्थानी भारत असेल. म्हणूनच आतापासून पाणी हा विषय समाजाला जोडण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी आणि त्याचे अधिकार गावाकडे द्यायला हवेत. गावासाठी सर्व राजकीय नेते एकत्र आल्यास पाच वर्षांत ग्रामीण महाराष्ट्र बदलेल, असा विश्‍वास राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

‘सकाळ’च्या येथील विभागीय कार्यालयाचा २६ वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात झाला. या वेळी झालेल्या ’पाणी आणि समाज’ या विषयावरील व्याख्यानात श्री. पवार बोलत होते. कालच्या आणि आजच्या गावाची मांडणी मांडतानाच श्री. पवार यांनी हिवरे बाजारची यशकथा अलगदपणे उलगडली. उपस्थित जनसमुदाय श्री. पवार यांनी दिलेला हा ‘ग्रामविकासाचा मंत्र’ घेऊनच बॅ. नाथ पै विद्यालयाच्या जनता खुले नाट्यगृहातून बाहेर पडला.

श्री. पवार म्हणाले, ‘‘पूर्वी पर्जन्यमानानुसार पीकपद्धती होती. २७ नक्षत्रांची मांडणी व १२ राशी हा त्याचा पाया होता. मात्र, खरिपातून रब्बीकडे वाटचाल झाल्यानंतर पाण्याची समस्या वाढली. राज्याला मिळालेल्या दिशादर्शक नेतृत्वामुळे ४० टक्के धरणे महाराष्ट्रात झाली. पण, सर्वांत जास्त पाणीटंचाईही महाराष्ट्रातच आहे. कारखानदारीला ५० टक्के पाणी जात आहे. शहरातील पाणीवापर वाढला आहे. त्याचा परिणाम धरणातील साठ्यावर होत आहे.’’

श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यातील ५२ टक्के भूभाग अवर्षणप्रवण आहे. पाचपैकी दोन वर्षे दुष्काळ पडतो. अशा परिस्थितीत कोणतेही सरकार आले तरी कर्जमाफी परवडणारी नाही. त्याऐवजी गावांना जलसंधारणासाठी निधी देण्याची गरज आहे.’’

दरम्यान, आमदार संध्यादेवी कुपेकर, नगराध्यक्षा स्वाती कोरी, ‘सकाळ’-कोल्हापूरचे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, सकाळ माध्यम समूहाचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांची उपस्थिती होती. स्नेहमेळाव्यात ‘सकाळ’वर वाचकांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. श्री. साळुंखे, श्री. रायकर यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, व्यवस्थापक (जाहिरात) नंदकुमार दिवटे, सहायक व्यवस्थापक (जाहिरात) अरुण भोगले यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

श्री. साळुंखे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘गडहिंग्लजचा वाचक सुज्ञ आहे. म्हणूनच ‘सकाळ’ येथे लवकर रुजला. लोकशिक्षण व समाज शिक्षणाचे साधन म्हणून लावलेल्या या छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सर्वांत प्रथम बातमी पोचविण्याच्या स्पर्धेत ’सकाळ’ने आघाडी घेतली आहे. ‘सकाळ’च्या केंद्रस्थानी \समाज आहे.’’

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दूरध्वनीवरून ‘सकाळ‘ला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल बन्ने, राजन पेडणेकर, बी. एन. पाटील, ॲड. सुरेश कुराडे, संपत देसाई, सभापती जयश्री तेली, तहसीलदार राजेश चव्हाण, सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.

कोल्हापुरातून ऊर्जा
श्री. पवार म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आल्यानंतर इथली हवा, पाणी आणि मातीमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. माणसाला माणूस म्हणून इतरांसाठी जगण्याची येथून ऊर्जा मिळते.’’

कॉर्पोरेट कंपन्याही पाणीप्रश्‍नात
श्री. पवार म्हणाले, ‘‘सध्या राज्यभर पाणीप्रश्‍नावर काम करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांसह सिने कलाकारही उतरले आहेत. विविध संघटना स्थापन करून त्याद्वारे पाणीप्रश्‍नावर जागृती केली जात आहे. या जागृतीचे चळवळीत रूपांतर होणे आवश्‍यक आहे. गावपातळीवरील संस्था, संघटना, ग्रामस्थ, मंडळे यांनी एकत्र येऊन काम केल्यास पाच वर्षांत कोणतेही गाव बदलू शकते.’’

‘सकाळ’चा पुढाकार
‘सकाळ’च्या उपक्रमांचे कौतुक करताना श्री. पवार म्हणाले, की राज्यातील दुष्काळ संपविण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेला पुढाकार मोठा आहे. पेमांडू कंपनी, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन, ‘सकाळ-तनिष्का’, यंग इन्स्पिरेशन नेटवर्क आदी माध्यमातून ‘सकाळ’च्या पुढाकाराने अनेक गावे पाणीदार झाली आहेत. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या सरपंच परिषदेमुळे तर राज्यातील सरपंचांना चांगली दिशा देण्याचा प्रयत्नही होत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com